When Will IPL 2025 Resume Again: भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आता आयपीएल स्पर्धेवर देखील झाला आहे. गुरूवारी धरमशालेच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सामना होणार होता. या सामन्यातील पहिल्या डावातील १० षटकं झाल्यानंतर हा सामना रद्द करावा लागला. स्टेडियममध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं आणि प्रेक्षकांना मैदान सोडून जाण्यासाठी सांगण्यात आलं. हा सामना रद्द होताच,आयपीएलचे पुढील सामने होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दहशतवांद्याकडून २२ एप्रिलला पहलगाममध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही ड्रोन हल्ले केले. मात्र, भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानच्या कुरापती थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे बीसीसीआयने हे महत्वाचं पाऊल उचललं आहे.
बीसीसीआयसमोर आहेत हे दोन पर्याय
बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही स्पर्धा पुन्हा केव्हा सुरू होणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. तणावाची परिस्थिती पाहता, आयपीएल लवकर सुरू होणार नाही हे तर स्पष्ट आहे. मात्र, बीसीसीआयसमोर आयपीएलचे उर्वरीत सामने खेळवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. आयपीएलचा फायनलचा सामना २५ मे रोजी होणार होता. मात्र, आता ही स्पर्धा पुढे ढकलली गेली आहे.
भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. मात्र, सद्यस्थिती पाहता भारतीय संघ बांगलादेश जाणार नाही. या मालिकेदरम्यान बीसीसीआय आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचे आयोजन करू शकते. पण ऑगस्ट महिन्यात भारतात पाऊस असतो, त्यामुळे हे सामने दुसऱ्या देशात खेळवले जाऊ शकतात.
आशिया चषक
यावर्षी आशिया चषक २०२५ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. मात्र, भारत- पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता या स्पर्धेचे आयोजन होणे देखील कठिण आहे. कारण या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने असतील. त्यामुळे ही स्पर्धा होण्याची देखील शक्यता खूप कमी आहे. या स्पर्धेदरम्यान बीसीसीआय आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचे आयोजन करू शकते.
आयपीएलमध्ये प्लेऑफ आणि फायनलच्या सामन्यासह एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत ५८ सामने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. बीसीसीआयने ठरवलं,तर एका दिवसात २ सामने खेळवू शकते. असं झाल्यास ८ ते १० दिवसात हे सामने पूर्ण होऊ शकतात. मात्र, इतर देशातील खेळाडू यावेळी उपलब्ध असतील की नाही हे देखील बीसीसीआयला पाहावं लागणार आहे.
2025-05-09T09:02:29Z