India vs West Indies 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली टेस्ट मॅच गुरुवारपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होणार आहे. या मॅचपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल याने बुधवारी हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन टीमच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ढगाळ वातावरणामुळे टीम एक अतिरिक्त पेसर खेळवण्याचा विचार करू शकते, असं शुभमन गिलने सांगितलं आहे.
सध्याचे वातावरण आणि खेळपट्टीची स्थिती पाहता एक अतिरिक्त पेसर खेळवण्याचा विचार होत आहे. खेळपट्टीतील ओलावा पाहून आम्ही उद्या अंतिम निर्णय घेऊ, असं शुभमन म्हणाला. जसप्रीत बुमराहच्या समावेशाबद्दल बोलताना गिलने स्पष्ट केलं की, त्याचा निर्णय मॅच टू मॅच घेतला जाईल. "बुमराहचा निर्णय तो एका टेस्टमध्ये किती बॉल्स टाकतो आणि अन्य बॉलर्सना कसं वाटतं, यावर अवलंबून असेल. सध्या तरी काहीही निश्चित झालेलं नाही," असे त्यानं स्पष्ट केलंय.
आशिया चषक जिंकल्यानंतर लगेचच टेस्टसाठी सज्ज होणे आव्हानात्मक आहे, पण तो तांत्रिक नसून मानसिक बदल आहे, असे गिलने नमूद केले. "आशिया चषकातून टेस्ट फॉर्मेटमध्ये येण्यासाठी कमी वेळ मिळाला. फॉर्मेट बदलताना तांत्रिक बदलांपेक्षा मानसिक तयारी अधिक महत्त्वाची असते." स्वतःच्या वर्कलोडबद्दल बोलताना तो म्हणाला, "बॉलर्सच्या तुलनेत बॅटर्ससाठी शारीरिक नाही तर मानसिक थकवा महत्त्वाचा असतो. मी आठवडा-दर-आठवडा विचार करतो, दूरचा विचार करत नाही. सध्या मी एकदम फ्रेश आहे."
गिल म्हणाला की, आम्ही कोणतीही सोपी मॅच खेळणार नाही, तर टफ क्रिकेट खेळण्याचा आमचा मानस आहे. "इंग्लंडमधील प्रत्येक टेस्ट मॅच खूप खोलवर गेली होती आणि आम्ही अशाच टफ क्रिकेटसाठी तयार आहोत. एक वर्षानंतर आम्ही भारतात टेस्ट सीरिज खेळत आहोत आणि आमच्यासाठी प्रत्येक सीरिज महत्त्वाची आहे. या सीरिजवर वर्चस्व गाजवण्याचा आमचा प्रयत्न असेल."
दरम्यान, भारतात येणाऱ्या कोणत्याही टीमला इथे स्पिन आणि रिव्ह्हर्स स्विंगचे आव्हान असते हे माहीत आहे. आम्हाला अशी विकेट हवी आहे, जी बॅटर्स आणि बॉलर्स दोघांनाही काहीतरी संधी देईल, असंही शुभमन गिल यावेळी म्हणाला आहे.
2025-10-01T09:18:10Z