मुंबईच्या पराभवानंतर दोन टीमना मिळाली लाईफलाईन, हार्दिकने पायावर धोंडा पाडला!

मुंबई : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सना पराभवाचा धक्का दिला. या पराभवासोबतच मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणं आणखी कठीण झालं आहे. आता प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला त्यांच्या उरलेल्या दोन पैकी दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईचे हे दोन सामने पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहेत. यातला पंजाब किंग्सविरुद्धचा सामना रविवार 11 मे रोजी धर्मशालाच्या मैदानात होईल, तर दिल्लीविरुद्धचा सामना गुरूवार 15 मे रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या दोन पैकी एक सामन्यात मुंबईचा विजय झाला तर प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला इतर टीमच्या कामगिरीवर आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावं लागणार आहे.

मुंबईच्या पराभवाने दोघांना लाईफ लाईन

मुंबईच्या गुजरातविरुद्धच्या पराभवाने केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सना लाईफ लाईन मिळाली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीने 11 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दिल्लीच्या खात्यात 13 पॉईंट्स आहेत. दिल्लीने उरलेले तीन सामने जिंकले तर ते 19 पॉईंट्सपर्यंत जाऊ शकतात, पण मुंबईने उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तरी ते 18 पॉईंट्सपर्यंत जातील.

मुंबईच्या पराभवाने केकेआरच्याही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 5 विजय मिळवले आहेत, तर त्यांचाही एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे केकेआरकडे 11 पॉईंट्स आहेत. केकेआरही त्यांचे उरलेले सगळे सामने जिंकून 17 पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतात.

तीन टीमचं स्थान निश्चित

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या, आरसीबी दुसऱ्या आणि पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तीनही टीमचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे, कारण या तीनही टीमना आता त्यांच्या उरलेल्या 3 मॅचपैकी एकच मॅच जिंकायची आहे. गुजरात आणि आरसीबीने त्यांच्या 11 पैकी 8 मॅच जिंकल्या आहेत, पण चांगल्या नेट रनरेटमुळे गुजरात पहिल्या आणि आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबने 11 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत आणि त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे पंजाबकडे 15 पॉईंट्स आहेत.

2025-05-07T09:30:08Z