मुंबई प्ले-ऑफला कशी पोहोचणार? 3 टीमच्या हातात भवितव्य, सगळ्यात सोपं इक्वेशन!
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मुंबईने 10 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. 6 पॉईंट्ससह मुंबई नवव्या क्रमांकावर आहे. खात्यामध्ये फक्त 6 पॉईंट्स असले तरीही मुंबईच्या प्ले-ऑफला जायच्या शक्यता वाढल्या आहेत, याला कारण ठरलं आहे ते टेबलमध्ये टॉपवर असलेल्या टीमची कामगिरी ढासळली आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील, हे सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे, पण उरलेल्या 2 जागांसाठी आठ टीममध्ये स्पर्धा आहे. 14 पॉईंट्सवर चौथी टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करते, हे अनेकदा आयपीएलमध्ये दिसून आलं आहे. हैदराबादचे 11 सामन्यांमध्ये 14 तर पंजाबचे 10 सामन्यांमध्ये 13 पॉईंट्स आहेत, त्यामुळे आणखी एक विजय मिळवला तरी या दोन्ही टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. प्ले-ऑफच्या उरलेल्या दोन टीममध्ये मुंबईला प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्यांचे उरलेले सर्व 4 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत, ज्यामुळे 14 पॉईंट्ससह त्यांचा नेट रनरेटही सुधारेल. सध्याच्या पॉईंट्स टेबलच्या स्थितीनुसार मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणं आरसीबी, राजस्थान आणि गुजरातच्या कामगिरीवर अवलंबून आहे. या टीमची कामगिरी खराब झाली तर मुंबई प्ले-ऑफला पोहोचू शकते. आरसीबी, राजस्थान आणि गुजरात यांचे 10 सामन्यांमध्ये 6 विजयांसह 12 पॉईंट्स आहेत. आता उरलेल्या 4 सामन्यांमध्ये या तिन्ही टीमचा 3 सामन्यांमध्ये पराभव झाला तर या टीम जास्तीत जास्त 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचतील. मुंबई इंडियन्सचे उरलेले सामने हे आरसीबी, राजस्थान, केकेआर आणि पंजाबविरुद्ध आहेत. हे चारही सामने मोठ्या फरकाने जिंकून मुंबई 14 पॉईंट्स आणि चांगल्या नेट रनरेटसह प्ले-ऑफमध्ये प्रवेश करू शकते. मुंबईला याचसोबत सीएसके आणि केकेआरकडूनही धोका आहे. सीएसकेचे 10 सामन्यांमध्ये 10 पॉईंट्स तर केकेआरचे 10 सामन्यात 9 पॉईंट्स आहेत, त्यामुळे या दोन्ही टीमने त्यांच्या उरलेल्या 4 सामन्यांपैकी कमीत कमी 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं, अशी मुंबईची अपेक्षा असेल.
2026-05-08T18:30:36Z
गुजरातने बिघडवला सेट झालेला खेळ, मुंबईच्या प्ले-ऑफचं इक्वेशन पुन्हा बदललं!
गुजरातने दिलेल्या 230 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा 16.3 ओव्हरमध्ये 152 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे गुजरातचा 77 रननी विजय झाला आहे. या विजयासोबतच गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गुजरात आणि हैदराबादचे 11 सामन्यांमध्ये 7 विजयांसह 14 पॉईंट्स आहेत, पण हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आहेत. आरसीबीने 10 सामन्यांमध्ये 6 तर राजस्थानने 11 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले आहेत, त्यामुळे या दोन्ही टीम चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. तर पंजाबचे 10 सामन्यांमध्ये 13 पॉईंट्स असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सीएसकेचे 10 सामन्यांमध्ये 10, केकेआरचे 10 सामन्यांमध्ये 9, दिल्लीचे 11 सामन्यांमध्ये 8 आणि मुंबई-लखनऊचे 10 सामन्यांमध्ये 6 पॉईंट्स आहेत. गुजरातच्या विजयामुळे मुंबईसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. IPL च्या प्ले ऑफसाठी 16 पॉईंट्स सुरक्षित मानले जातात, तर 18 पॉईंट्ससह प्ले ऑफचं तिकीट निश्चित होतं. गुजरातने विजय मिळवल्यामुळे आता 3 पैकी एक सामना जिंकूनही ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील. गुजरातच्या या विजयाचा फटका मुंबईला बसला आहे, कारण मुंबईचे सध्या फक्त 6 पॉईंट्स आहेत. उरलेल्या 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी मुंबई 14 पॉईंट्सवरच जाऊ शकते. गुजरात जिंकल्यामुळे आता मुंबईला त्यांचे उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत, कारण त्यांना नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. मुंबईचा नेट रनरेट हा सध्या मायनस 0.649 आहे. याशिवाय मुंबईला हैदराबाद, पंजाब, आरसीबी आणि राजस्थान यांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे.
2026-05-09T18:15:33Z
विराट-रोहित कुणीच सेफ नाही... रहाणेने बिघडवला सगळ्यांचा गेम, प्ले-ऑफचं समीकरण फिस्कटलं!
दिल्लीने दिलेलं 143 रनचं आव्हान केकेआरने 14.2 ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट गमावून पार केलं. फिन ऍलनने नाबाद 100 रन केले तर ग्रीनने 33 आणि रहाणेने 13 रनची खेळी केली. केकेआरचा या मोसमातला हा सलग चौथा विजय आहे. मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये केकेआरला एकही विजय मिळाला नव्हता, पण नंतर मात्र केकेआरने दणक्यात कमबॅक केलं आहे. केकेआरने 10 सामन्यांमध्ये 4 विजय मिळवले आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तसंच त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. 9 पॉईंट्ससह केकेआर सातव्या क्रमांकावर आहे. केकेआरने उरलेल्या 4 सामन्यांमध्ये 4 विजय मिळवले तर त्यांच्या खात्यात 17 पॉईंट्स होतील आणि केकेआर प्ले-ऑफमध्येही प्रवेश करेल. केकेआरच्या या विजयामुळे मुंबईसह इतर टीमचं टेन्शनही वाढलं आहे. पहिल्या 6 सामन्यांपैकी एकही मॅच जिंकली नसल्यामुळे केकेआर प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर आहे असं वाटत होतं, पण आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात टेबल टॉपर टीमची कामगिरी ढासळल्यामुळे केकेआरच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 11 सामन्यांमध्ये 7 विजयांसह हैदराबाद पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत, तर पंजाबचे 10 सामन्यात 6 विजयांसह 13 पॉईंट्स आहेत. आरसीबी, राजस्थान, गुजरात यांचे 10 सामन्यांमध्ये 6 विजयांसह 12 पॉईंट्स आहेत. तर सीएसकेने 10 सामन्यात 5 विजयांसोबत 10 पॉईंट्स मिळवले आहेत. केकेआरच्या खात्यात 9 पॉईंट्स आहेत. दिल्लीचे 11 सामन्यात 8, मुंबईचे 10 सामन्यात 6 आणि लखनऊचेही 10 सामन्यात 6 पॉईंट्स आहेत. केकेआरच्या या विजयाचा सर्वाधिक फटका दिल्ली, मुंबई आणि लखनऊला बसला आहे. केकेआरने उरलेल्या 4 सामन्यांमध्ये 3 विजय जरी मिळवले तरी त्यांचे 15 पॉईंट्स होतील. या परिस्थितीमध्ये मुंबई, दिल्ली आणि लखनऊने त्यांच्या उरलेल्या सर्व मॅच जिंकल्या तरी ते 14 पॉईंट्सपर्यंत जातील, त्यामुळे ते केकेआरला मागे टाकू शकणार नाहीत. आयपीएलचा आतापर्यंतचा इतिहास बघितला तर प्ले-ऑफमध्ये चौथी टीम 14 पॉईंट्सवर क्वालिफाय होते. केकेआरच्या या विजयामुळे आणि पावसाचा एक पॉईंट मिळाल्यामुळे मुंबईसह दिल्ली, लखनऊच्या अडचणी वाढल्या आहेत.
2026-05-08T17:45:42Z