मुंबई: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात द. आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे. पण या इतिहासाचा खरा शिल्पकार आहे मूळचा मुंबईकर आणि भारतीय महिला संघाचा मुख्य कोच अमोल मुजुमदार. ज्या अमोल मुजुमदारला कधीही भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळालं नाही त्यात अमोल मुजुमदारच्या शिकवणीवर महिला भारतीय संघाने थेट विश्वचषकाला गवसणी घातली.
अमोल मुजुमदार हे भारतीय क्रिकेटातील एक असं नाव आहे ज्या खेळाडू म्हणून राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही त्याच्या समर्पण, शिस्त आणि नेतृत्वामुळे त्याने क्रिकेट क्षेत्रात अमिट छाप सोडली आहे. 11 नोव्हेंबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेला अमोल मुजुमदार हा मूळचा मुंबईकर आहे. तो भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य कोच म्हणून 2023 पासून कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी 2025 च्या आयसीसी महिला वनडे विश्वचषकात पहिल्यांदाच विजय मिळवला. हा विजय केवळ एक ट्रॉफी नाही, तर अमोलच्या दीर्घ क्रिकेट यात्रेचे सुखद परिपूर्ण आहे. चला, जाणून घेऊया अमोल मुजुमदारबद्दल सविस्तरपणे.
अमोल मुजुमदार याचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनिल मुजुमदार हे क्रिकेटप्रेमी होते आणि त्यांनी अमोलला लहानपणापासूनच क्रिकेटची ओढ लावली. अमोलने प्राथमिक शिक्षण बी.पी.एम. हायस्कूलमधून घेतले, परंतु त्याने कोच रामकांत आचरेकर यांच्या सल्ल्याने तो शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत दाखल झाला. ही शाळा मुंबईत क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे आणि याच ठिकाणी अमोलची भेट सचिन तेंडुलकरशी झाली, ज्याने त्याच्या कारकीर्दीवर खूप प्रभाव टाकला. रामकांत आचरेकर हे सचिनसह अनेक दिग्गजांचे गुरू होते आणि त्यांनी अमोलला बॅटिंगमधील तंत्र आणि मानसिक तयारी शिकवली. लहानपणापासून अमोल हा शांत, शिस्तबद्ध आणि मेहनती स्वभावाचे होते, ज्यामुळे तो "न्यू तेंडुलकर" म्हणून ओळखला जाऊ लागला होता.
अमोल मुजुमदार हा प्रामुख्याने उजव्या हाताचा बॅट्समन आणि उजव्या हाताचा लेग-स्पिनर होता. त्याने 1993-94 मध्ये मुंबईसाठी पहिल्या फर्स्ट-क्लास सामन्यात हरियाणाविरुद्ध 260 धावा केल्या होत्या, जी पहिल्या सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने 9000 पेक्षा जास्त धावा केल्या आणि अमरजित कायपीचा विक्रम मोडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याच्या एकूण फर्स्ट-क्लास कारकीर्दीत 171 सामन्यांत 11,167 धावा (30 शतके, सरासरी 48.13) आणि लिस्ट A मध्ये 3286 धावा (3 शतके) केल्या आहेत.
मुंबईसाठी खेळताना त्याने 8 रणजी ट्रॉफी विजेतेपदही मिळवले आहेत. 2006-07 मध्ये तो मुंबईचा कर्णधार झाला आणि संघाला रणजी ट्रॉफी जिंकवली. या हंगामात त्याने मुंबईसाठी सर्वाधिक धावाही केल्या आणि अशोक मंकडचा विक्रम मोडला. 2002 मध्ये निवड न मिळाल्याने तो क्रिकेट सोडण्याच्या विचारात होता, पण वडिलांच्या प्रोत्साहनाने ते पुढे खेळत राहिला. 2009 मध्ये मुंबईच्या मुश्ताक अली टी-20 संघातून वगळल्यानंतर तो आसामकडे गेला (2009-11), नंतर आंध्र प्रदेशकडे (2012-13) रणजी हंगामात खेळून तो स्वतःहून निवृत्त झाला, जेणेकरून तरुणांना संधी मिळेल.
परदेशी आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द: अमोलला कधीच पूर्ण भारतीय संघात स्थान मिळाले नाही, तरीही त्याने भारत अ संघात राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीसोबत खेळला. 1994 मध्ये तो भारत अंडर-19 चा उपकर्णधार होता आणि इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पण तरीही निवड समितीच्या निर्णयांमुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकला नाही.
निवृत्तीनंतर अमोल मुजुमदार कोचिंगकडे वळला. त्याने बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत (NCA) वयोगट संघांचे प्रशिक्षण घेतले. तो भारत अंडर-19 आणि अंडर-23 संघाचा बॅटिंग कोच होता. 2013 मध्ये नेदरलँड्स संघाचा बॅटिंग कन्सल्टंट आणि 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यातील बॅटिंग कोच होता. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा बॅटिंग कोच (2017-2021) आणि मुंबईचे मुख्य कोच म्हणून त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली.
महिला संघाचा मुख्य कोच: 25 ऑक्टोबर 2023 रोजी बीसीसीआयने अमोलला भारतीय महिला संघाचे मुख्य कोच नेमले. हे पद डिसेंबर 2022 पासून रिक्त होते. क्रिकेट सल्लागार समिती (सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे) यांनी त्याची शिफारस केली होती. ज्यानंतर त्याची नेमणूक झाली.
अमोलचे कोचिंग तत्त्व हे शांत, विश्वासपूर्ण आणि आधुनिक आहे. तो खेळाडूंना मानसिक मजबुती आणि फिनिशिंग स्किल्स शिकवत आला आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने स्थिरता मिळवली आणि त्याने युवा खेळाडूंना संधी दिली, जसे की क्रांती गौड आणि श्री चरणी.
अमोल याच्या कोचिंगखाली भारतीय महिलांनी 2025 विश्वचषकात इतिहास रचला. सुरुवातीला सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध 339 धावांचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
तर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकली. भारताच्या पुरुष संघाने आतापर्यंत केवळ दोनदा वनडे विश्वचषक जिंकला आहे. 1983 आणि 2011 साली. तर महिला संघाने पहिल्यांदाच 2025 साली विश्वचषक पटकावला आहे. ज्यामध्ये अमोल मुजुमदारचा मोठा वाट आहे.
अमोलचे वैयक्तिक जीवन खूपच खाजगी आहे. तो मुंबईत राहतो आणि कुटुंबासोबत वेळ घालवतो. त्याचे वडील त्याच्या क्रिकेट कारकीर्दीचे मुख्य प्रेरणास्रोत होते. अमोल हा शांत स्वभावाचा आहे आणि क्रिकेटबाहेर वाचन आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याला आवडते. त्याला "टेड लॅसो" सारखे कोच म्हणून ओळखले जाते. अचूक रणनिती आणि संयम हेच त्याच्या यशाचे गमक आहे.
अमोल मुजुमदार हा "नियरली मॅन" ते "विनर" पर्यंतच्या प्रवासाचा प्रतीक आहे. त्याच्या शांत नेतृत्वाने भारतीय महिला क्रिकेटला नवे वळण दिले आहे. भविष्यात ते आणखी यश मिळवतील, यात शंका नाही!
2025-11-02T19:49:48Z