ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्हा हा दहावी व बारावीसाठी लातूर पॅटर्न (Latur HSC Pattern) म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेतात यामुळे या पॅटर्नला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र यावर्षी वीस वर्षानंतर सर्वात कमी निकाल लागल्याचे समोर आले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील देवणी येथील एका आठवड्यापूर्वी झालेल्या एका युवकाचा नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण घेऊन लातूर केंद्रातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पण हे यश पाहण्याचे भाग्य त्याला लाभले नाही. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्दैवी कहाणी आहे देवणी येथील विवेक वर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणारा विद्यार्थी सय्यद मोहम्मद कासिफ उर्फ शेरू याची. शेरुने मोठ्या मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करत बारावीची परीक्षा दिली. एचएससीचा निकाल जाहीर झाला आणि ९० टक्के गुण घेऊन केंद्रातून प्रथम येण्याचा मान शेरुने मिळवला. मात्र हे यश पाहण्याचे भाग्य त्याला लाभले नाही. कारण गेल्या आठवड्यात तो नातेवाईकाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेला असता तेथे पोहोण्याच्या नादात त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता.