ROHIT SHARMA : सर्वांत मोठी बातमी, रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी!

Rohit Sharma Test Captaincy : मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) रोहित शर्माला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी नवीन कर्णधार निवडण्याचा निर्णय घेतला आहे आणि बीसीसीआय त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने हा निर्णय रोहितच्या ३८ वर्षांच्या वयामुळे नाही. तर त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरी आणि फॉर्म च्या आधारावर घेतला आहे, असे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे रोहितने २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून दिल्यानंतरही त्याला कर्णधारपदी कायम राहायचे होते, असे वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिले आहे.

वृत्तपत्राने एका बीसीसीआय अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, निवड समितीची विचार प्रक्रिया स्पष्ट आहे. त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी एक नवीन नेता हवा आहे आणि रोहित कर्णधार म्हणून योग्य नाही. विशेषत: त्याची कसोटीतील खराब कामगिरी पाहता. त्यांना पुढील कसोटी मालिकेसाठी एका युवा नेत्याला तयार करायचे आहे आणि निवड समितीने बीसीसीआयला कळवले आहे की रोहित संघाचे नेतृत्व करणार नाही.

अहवालात पुढे नमूद केले आहे की रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून कायम राहील. निवड समितीने एप्रिल महिन्यात रोहितच्या भारतीय कसोटी संघातील भविष्यावर ‘चर्चांच्या अनेक फेऱ्या’ घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे समजते. मंगळवारी (६ मे) मुंबईतही या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी आपला अभिप्राय बीसीसीआयला कळवला.

आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की रोहित, जो कसोटी संघात केवळ एक विशेषज्ञ फलंदाज असेल, तो संघात खेळणे आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणे सुरू ठेवतो की नाही.

अहवालात असेही म्हटले आहे की बीसीसीआयच्या हितधारकांना ऑस्ट्रेलियातील शेवटच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ‘स्थिरतेचा अभाव’ पुन्हा अनुभवायचा नाही. त्या मालिकेत रोहितने पाच डावांमध्ये केवळ ६.२० च्या सरासरीने धावा केल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून त्याने स्वतःला वगळले होते. पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते.

अहवालातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवड समिती रोहितला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यास ‘उत्सुक’ नाही आणि तो केवळ विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळल्यास अधिक सोयीस्कर असेल, कारण खराब कामगिरी झाल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळता येऊ शकते. या अस्थिरतेचा संघावर ‘विपरीत’ परिणाम झाला होता आणि निवड समितीला ते टाळायचे आहे, असेही अहवालात नमूद केले आहे.

या घडामोडींमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे आणि इंग्लंड दौऱ्यासाठी नवीन कसोटी कर्णधार कोण असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

2025-05-07T14:00:14Z