टीम इंडियामध्ये फूट पडली? ड्रेसिंग रुममधील वातावरण 'गंभीर'; गौतम यांनी अखेर खरं काय ते बोलून दाखवलं

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी इंग्लंड भारत दौऱ्यावर आले आहे. जिथे भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली, जी भारत ४-१ ने जिंकण्यात यशस्वी ठरली. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्यांचा पहिला सामना ६ फेब्रुवारीला होणार आहे. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना वानखेडेवर खेळला गेला. भारताला हा सामना १५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकण्यात यश आले. त्यामुळे टीम इंडियाचे खूप कौतुक होत आहे.याआधी जेव्हा टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसारखी महत्त्वाची कसोटी मालिका गमावली होती, तेव्हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये फूट पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील भांडणाच्या बातम्यांवर उघडपणे बोलून आपले मौन सोडले आहे.

गौतम गंभीरने सत्य सांगितले

सामन्यानंतर अभिनव मुकुंद, पार्थिव पटेल आणि केविन पीटरसन यांनी गौतम गंभीरला संघातील वातावरणाबद्दल प्रश्न विचारले असता, त्याने न डगमगता उत्तर दिले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये वादाच्या बातम्यांबाबत गंभीर म्हणाला, "या खेळाडूंनी एकमेकांसोबत भरपूर क्रिकेट खेळले आहे. महिनाभरापूर्वीही अनेक अफवा (हसल्या) होत्या. जेव्हा भारतीय क्रिकेटची कामगिरी खराब होते तेव्हा, मग ड्रेसिंग रूमबद्दल गोष्टी सांगितल्या जातात, परंतु जसजसे निकाल आमच्या बाजूने जाऊ लागतात, तेव्हा सर्वकाही सामान्य होते."

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका वेळापत्रक

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ज्याचा पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे होणार आहे. यानंतर या दोघांमधील दुसरा वनडे सामना ९ फेब्रुवारी रोजी बाराबती स्टेडियम, कटक येथे होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी दुबईला रवाना होईल.

2025-02-03T04:56:51Z