MI VS RCB सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव मोठा बदल, पाहा PLAYING XI मध्ये कोणाला संधी

मुंबई : आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव बदल केल्याचे हार्दिकने टॉसनंतर सांगितले.

या महत्वाच्या सामन्यासाठी पीयुष चावलाला संघाबाहेर करण्यात आहे आहे. पीयुषच्या जागी यावेळी श्रेयस गोपालला संघात संधी देण्यात आली आहे. श्रेयसचा हा मुंबईसाठी ५० वा सामना असणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाची गुरुवारी आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाशी लढत होणार आहे. घरच्या मैदानावर मागील लढतीत मुंबईने विजय मिळवला होता. या कामगिरीत सातत्य राखण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, विजयासाठी संघर्ष करीत असलेला बेंगळुरू संघाचीही विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न असेल.

गेल्या रविवारी पार पडलेल्या लढतीत मुंबईने यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदविला. आता या कामगिरी सातत्य राखण्याचे आव्हान मुंबईपुढे असेल. आपल्या आयपीएल मोहिमेची सुरुवात संथ करून मग वेग पकडण्याची मुंबईला सवय आहे. त्यामुळे आता 'गीअर' बदलण्याची वेळ आली आहे, याचे भान त्यांनी बाळगायला हवे. बेंगळुरूविरुद्धचा विजय मुंबईच्या आत्मविश्वासात भर घालेल; कारण पुढील लढतीत त्यांना चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करायचे आहेत. सलामीला रोहित शर्मा धावा करतो. त्याला ईशान किशनचीही साथ लाभते; मधल्या फळीतील फलंदाज मात्र सतत अपयशी ठरत आहेत. कर्णधार हार्दिक पंड्याने पुढाकार घेऊन खोऱ्याने धावा करणे आवश्यक आहे. त्याने टीकाकारांना कामगिरीतून उत्तर देणे आवश्यक आहे.

खेळपट्टीचा अंदाज : वानखेडेची खेळपट्टी बऱ्याचदा फलंदाजांना साजेश असते. त्यामुळे मोठी धावसंख्या अपेक्षित. प्रथम फलंदाजी करणारा संघ अधिकाधिक धावांचे आव्हान उभारण्यास प्राधान्य देईल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघास दवाच्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

आरसीबीचे पाच सामन्यांत चार पराभव झाले आहेत यावरूनच बेंगळुरूने आयपीएल लिलावात बोली लावताना हुशारी दाखवलेली नाही हे कळते. परिणामी ऐन मैदानावरील त्यांची कामगिरीही सुमारच आहे. आरसीबीकडून विराट कोहली धावा करतो; पण इतरांच्या अपयशामुळे हा संघ एकखांबी तंबू झाला आहे. विराटने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत एक शतक, दोन अर्धशतकांसह ३१६ धावा फटकावल्या आहेत. मात्र, त्याला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभत नाही. साधारण पाच महिन्यांपूर्वी वन-डे वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत विराटने याच वानखेडेवर ५०वे वन-डे शतक ठोकले होते. त्यानंतर तो पुन्हा याच मैदानावर फलंदाजीस सज्ज होईल. बेंगळुरूकडून फाफ डुप्लेसिस (१०९ धावा), ग्लेन मॅक्सवेल (३२ धावा), कॅमेरून ग्रीन (६८ धावा) या परदेशी खेळाडूंनी कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत मॅक्सवेलने चार मोहरे टिपले आहेत; पण इतर प्रमुख गोलंदाज निष्प्रभ ठरत आहेत.

मुंबई वि. बेंगळुरूठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई

प्रक्षेपण : रात्री ७.३० पासून स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमावर.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-11T13:46:39Z dg43tfdfdgfd