आरसीबीच्या विजयानंतरही विराट कोहलीवर चाहते नाराज, पाहा नेमकं घडलं तरी काय...

हैदराबाद : आरसीबीचा संघ पराभवाच्या चक्रात अडकला होता. पण अखेर त्यांना विजय मिळाला. तब्बल सहा पराभव झाल्यावर त्यांना विजय मिळवता आला. आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा सर्वात आनंदाचा क्षण होता. पण आरसीबीचे चाहते यावेळी मात्र विराट कोहलीवर नाराज असल्याचे पाहायला मिळाले.

अर्धशतक पूर्ण करूमही विराटच्या स्ट्राईक रेटने त्याच्या फलंदाजीवर प्रश्न विचारण्यास भाग पाडले. पॉवर प्लेमध्ये विराटने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आणि आरसीबीला आक्रमक सुरवात करून दिली. पंरतु, पॉवरप्लेनंतर विराट शांतच झाला. मात्र, त्यानंतर आरसीबीला धावगती उंचावता आली नाही. यात विराटच्या स्ट्राईक रेटचा हात आहे असे म्हटले जात आहे. या सामन्यात कोहली सलामीला उतरला होता. पहिल्या ६ षटकांत विराटच्या बॅटने १८ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकार लगावले होते. तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट १८० एवढा होता. पण त्यानंतर पाटीदारच्या आक्रमकते वेळी विराटने बघ्याची भूमिका घेतली. पॉवरप्लेनंतर विराटचा स्ट्राईक रेट घसरून ७५ जवळपास आला आणि १५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला.

विराटने या सामन्यात ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी करत अर्धशतक केले. ३७ चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. याच सामन्यात रजत पाटीदारने आरसीबीकडून आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या १९ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. आठव्या ते तेराव्या षटकात पाटीदारच्या बॅटमधून ५ षटकार आणि २ चौकार पाहायला मिळाले. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर या आधी ही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. त्यामुळे काही जण त्याला टी-२० च्या विश्वचषक संघात सामावून घेण्याच्या बाजूने नाहीत.

गुणतालिकेत तळाशी असलेल्या आरसीबीचा सामना सातत्याने प्रभावी फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद सोबत होता. पंरतु, सततच्या पराभवानतंर अखेरीस आरसीबीला विजयाचा झेंडा उंचवण्यात यश आले. नाणेफेक जिंकून आरसीबीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण यासगळ्यात विराटच्या खेळीत काही धमक पाहायला मिळाले नाही.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T14:42:57Z dg43tfdfdgfd