टॉस गमावूनही हार्दिक पंड्या झाला खूष, मैदानात असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

मुल्लानपूर : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात टॉस गमावला. पण टॉस गमावूनही हार्दिक पंड्या चांगलाच आनंदात दिसला. टॉस गमावल्यावर आपण आनंदी का आहोत, याचे कारणही हार्दिकने यावेळी सांगितले.

मुंबई इंडियन्सचा या कागदावरील ताकदवान संघास अजूनही लय गवसलेली नाही. घरच्या मैदानावरील दोन सामने जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. हार्दिक पंड्या गोलंदाजी; तसेच फलंदाजीत अपयशी ठरत आहे. गेराल्ड कोएत्झी आणि आकाश मढवालकडून धावांची खैरात वाटली जात आहे. हार्दिक मधल्या फळीत खेळल्यास डावाला स्थैर्य देत नाही किंवा तळाला खेळल्यास धावगतीस वेग देण्यातही अपयशी ठरलेला आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीवर मुंबईची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे. सूर्यकुमार यादवच्या कामगिरीत सातत्याचा अभाव ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे, कारण तो दोन वेळा शून्यावर बाद झालेला आहे.

हार्दिक पंड्या टॉसच्या वेळी म्हणाला की, " पंजाबच्या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आम्हाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. पण या निर्णयाने मी आनंदी आहे. कारण जर मी टॉस जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. त्यामुळे टॉस गमावल्याचे मला वाईट नक्कीच वाटत नाही."

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान राखण्यास प्रयत्नशील आहेत. तळाला असलेल्या या दोन संघांमध्ये आज, गुरुवारी तिसऱ्या विजयासाठी लढत होणार आहे. दोघांच्या कामगिरीत आणि निव्वळ धावगतीतही फारसा फरक नाही. प्रतिस्पर्ध्यांनी यापूर्वीची लढत गमावली आहे. त्यामुळे अधिक कणखरता दाखवणारा संघ जिंकू शकेल.

कर्णधार शिखर धवन खांदा दुखावल्यामुळे दहा दिवस न खेळण्याची शक्यता आहे, त्यामध्येच संघाचे फलंदाज चांगल्या फॉर्मात नाहीत. शशांकसिंह आणि आशुतोष शर्मा या नवोदितांची प्रभावी फलंदाजी हीच जमेची बाब आहे. दोघांनीही खालच्या क्रमांकावर खेळताना आघाडीच्या फलंदाजांचे अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभसिमरन सिंगच्या अवघ्या ११९ धावा, हेच जितेश शर्माबाबतही घडले आहे. सॅम करन आणि कॅगिसो रबाडा यांची गोलंदाजी चांगली होत आहे; पण अर्शदीप सिंग, हर्षल पटेल यांच्याकडून धावांची खैरात वाटली जातल आहे.

पंजाब वि. मुंबई

ठिकाण ः महाराजा यादविंद्रसिंग क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर (चंडिगड)

प्रक्षेपण ः संध्याकाळी ७.३० पासून स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

यंदाच्या स्पर्धेत ः पंजाब आणि मुंबईचा प्रत्येकी सहापैकी चार सामन्यांत विजय. गुणतक्त्यात पंजाब सातवे, तर मुंबई आठवे. पंजाबची निव्वळ धावगती -०.२१८ तर मुंबईची -०.२३४

गेल्या पाच सामन्यांत ः पंजाबचा एक विजय आणि चार पराभव, तर मुंबईचे दोन विजय आणि तीन पराभव

एकमेकांविरुद्ध ः प्रतिस्पर्ध्यातील ३१ लढतींत मुंबईचे ३१-१६ असे वर्चस्व. गेल्या पाचपैकी तीन सामन्यांत पंजाबचा विजय. मात्र, यापूर्वीच्या लढतीत मुंबईची सरशी.

हवामानाचा अंदाज ः सामन्याच्या वेळी तापमान २३ अंश असण्याची शक्यता. दवाचा परिणाम होऊ शकतो.

खेळपट्टीचा अंदाज ः तीनपैकी दोन सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी. प्रामुख्याने फलंदाजीस साथ देणारी खेळपट्टी

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-18T13:55:18Z dg43tfdfdgfd