धोनीने कर्णधारपद सोडलं तेव्हा चेन्नईच्या संघात नेमकं काय घडलं, जाणून घ्या इनसाइड स्टोरी

चेन्नई : महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय कधी आणि कसा सांगितला. त्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंची प्रतिक्रीया नेमकी कशी होती, या खास गोष्टी आता समोर आल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघाला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने गुरुवारी कर्णधारपद सोडले. त्याने आपला 'मुकुट' युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे सोपविला. खेळाडू म्हणून धोनीची ही अखेरची आयपीएल असल्याचे हे संकेत आहेत. निवृत्तीपूर्वी धोनीच्या मार्गदर्शनाखाली आता नवा कर्णधारपद तयार करण्याचे काम या मोसमात सुरू होईल. पण धोनीने कर्णधारपद सोडले तेव्हा नेमकं काय घडलं होतं, ते चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले आहे.

फ्लेमिंग म्हणाले की, " धोनी जेव्हा ब्रेकफास्टसाठी आला तेव्हा सर्व खेळाडू तिथे हजर होते. त्यावेळी धोनीने सर्वांसमोर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचा बॉम्ब फोडला. त्यावेळी खेळाडूंना नेमकं काय बोलावं ते कळत नव्हतं, पण प्रत्येक खेळाडूचे डोळे पाणावलेले होते. कारण धोनीचे सर्व खेळाडूंच्या आयुष्यात मानाचे स्थान आहे. पण जेवढा धक्का सर्वांना २०२२ साली बसला होता, तेवढा यावेळी बसला नाही. २०२२ साली जेव्हा धोनीने असंच सर्वांसमोर आपण कर्णधारपद सोडून जडेजाकडे ही जबाबदारी सोपवत असल्याचे जेव्हा सांगितले होते. त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण यापूर्वी अशी गोष्ट घडल्यामुळे आम्हाला धक्का बसला पण तो मोठा नक्कीच नव्हता. त्यामुळे सर्व खेळाडूंनी धोनीचा हा निर्णय मान्य केला आणि त्यानंतर ते सर्व जण ऋतुराजचे अभिनंदन करण्यासाठी पुढे सरसावले."

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३ या वर्षी विजेतेपद पटकावले होते. ४२ वर्षीय धोनीने २०२२च्या आयपीएल मोसमातही असेच तडकाफडकी कर्णधारपद सोडले होते. त्या वेळी त्याने रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपविले होते. मात्र, जडेजाला हा 'मुकुट' काही सांभाळता आला नाही. आठ सामन्यांनंतरच त्याने सूत्रे पुन्हा धोनीकडे सोपविली होती. त्या मोसमात चेन्नई संघ सातव्या क्रमांकावर राहिला होता.

त्याआधी १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

2024-03-22T11:20:07Z dg43tfdfdgfd