पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 5 विकेट्सने फायनल जिंकली!

India vs Pakistan Highlights World Championship of Legends Final: भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर धूळ चारली आहे. भारतीय संघाने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स 2024 चा अंतिम सामना 5 विकेट्सने जिंकला आहे. भारताने या सामन्यामध्ये कट्टर प्रतीस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री उशीरा बर्मिंगहम येथे झालेल्या या सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताने समोर ठेवलेलं आव्हान भारतीय खेळाडूंनी 5 विकेट्स आणि 5 चेंडू शिल्लक असतानाच गाठलं.

पाकिस्तानची फलंदाजी कशी झाली

पाकिस्तानच्या संघाने भारतासमोर 157 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाने 19.1 ओव्हरमध्येच 5 बाद 159 पर्यंत मजल मारत चषकावर आपलं नाव कोरलं. अंबती रायडूने अवघ्या 30 बॉलमध्ये दमदार अर्धशतक झळकावत भारताच्या विजयामध्ये मोलाची भर घातली. पाकिस्तानकडून तन्वीर सोहेलने तीन विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. पाकिस्तान चॅम्पियन्सच्या संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा केल्या. यामध्ये शोएब मलिक 41 धावा करत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारा पाकिस्तानी खेळडू ठरला. पाकिस्तानकडून कमरान अकमलने 24 धावा केल्या. सारजील खानने 12, मसूदने 21 धावांचं योगदान दिलं. मिसाब 18 धावांवर बाद झाला तर तळाच्या तन्वीरनेही 19 धावा करत मोलाचं योगदान दिलं. भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास अनुरित सिंगने पाकिस्तानच्या 3 गड्यांना बाद केलं. विनय कुमार, पवन नेगी आणि इरफान पठाणने प्रत्येक एक विकेट घेतली. 

पठाणचे 3 सिक्स

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 13 धावांची गरज होती. युवराज सिंग 14 आणि युसूफ पठाण 24 धावांवर खेळत होते. मात्र मोठा फटका मारुन जिंकण्याच्या नादात पठाण 30 धावांवर असताना रईझच्या गोलंदाजीवर मसूदकरवी झेलबाद झाला. युसूफ बाद झाल्यानंतर इरफान पठाण फलंदाजीसाठी आला. युवराज आणि इरफानने भारताला सामना जिंकवून दिला. भारताकडून गुरक्रित सिंग मानने 34 धावा केल्या. कर्णधार युवराज सिंग 15 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून रायडूने 2, गुरक्रितने 1 तर युसूफने 3 षटकार लगावले. तन्वीरशिवाय पाकिस्तानकडून अरमान यामीनने 1 विकेट घेतली. तर वाहाब रियाझने 2 विकेट्स घेतल्या.

मागच्या महिन्यातच पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामना जिंकला

नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना 7 धावांनी जिंकला होता. आता भारताच्या माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना धूळ चारली आहे.

2024-07-14T02:02:47Z dg43tfdfdgfd