मुंबईकरांनो सावधान! हार्दिक पंड्याची खिल्ली उडवल्यास थेट पोलीस कारवाई; मुंबईतील मॅचआधी निर्णय

IPL 2024 Action To Be Taken Against Cricket Fans In Mumbai:  इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या पर्वातील मुंबईतील पहिला सामना 1 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ काही दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाला असून जोरदार सराव सुरु आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे रोहित शर्मा कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतरचा हा मुंबईतील पहिलाच समाना असल्याने नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्याची हुर्यो उडवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंड्याला मुंबईकर क्रिकेट चाहत्यांकडून विरोध सहन करावा लागू शकतो असा अंदाज आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये झालेल्या मुंबईच्या दोन्ही सामन्यांमध्ये हेच चित्र पाहायला मिळालं. मात्र वानखेडेच्या मैदानात पंड्याची खिल्ली उडवणं क्रिकेट चाहत्यांना महागात पडू शकतं असं चित्र दिसत आहे. 

पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये उडवण्यात आली खिल्ली

आयपीएल सुरु होण्याच्या काही महिने आधी प्लेअर्स ट्रेडमध्ये मुंबईच्या इंडियन्सच्या व्यवस्थापनाने हार्दिकला पुन्हा संघात स्थान देण्याचा निर्णय घेत गुजरात टायटन्सकडून त्याला विकत घेतलं. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये मागील 10 वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्या आणि 5 वेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं. मात्र मुंबईच्या संघाचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. सोशल मीडियापासून ते अगदी आता आयपीएल सुरु झाल्यानंतर मैदानातही पंड्याविरुद्धचा रोष दिसून येत आहे. गुजरातविरुद्धच्या यंदाच्या पर्वातील मुंबईच्या पहिल्याच सामन्यात टॉसच्या वेळी अहमदाबादच्या मैदानात चाहत्यांनी पंड्याची खिल्ली उडवली. असाच प्रकार सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यापूर्वीही हैदराबादच्या मैदानात पाहायला मिळाला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला मोठा निर्णय

याच पार्श्वभूमीवर आता पुढील 4 सामने वानखेडेमध्ये होणार असल्याने पंड्याला चाहत्यांकडून पुन्हा टार्गेट केलं जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच थेट मुंबई क्रिकेट असोसिएशनने मैदानात पंड्याला चाहत्यांकडून त्रास दिला जाण्याची शक्यता असल्याने काही कठोर निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे पंड्याची टर उडवणाऱ्या मुंबईकर क्रिकेट चाहत्यांच्या अडचणी वाढू शकतात असं सध्या दिसत आहे. अनेक मराठी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनने हार्दिकविरुद्ध घोषणाबाजी होऊ वानखेडेमधील सामन्यात गोंधळ होऊ शकतो या शक्यतेच्या आधारावर मैदानातील सुरक्षेत वाढ केली आहे.

नक्की वाचा >> रोहित निवृत्त होतोय? यंदाचं IPL पर्व शेवटचं? MI च्या कोचचे संकेत; म्हणाला, 'मुंबई इंडियन्सच्या..'

तसेच  वानखेडेमध्ये होणाऱ्या मुंबईच्या संघाच्या चारही सामन्यांना येणाऱ्या प्रेक्षकांवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. पंड्याला चिडवणाऱ्या, डिवचणाऱ्या किंवा त्याच्याविरुद्ध अयोग्य शब्दप्रयोग करताना आढळून आल्यास अशा क्रिकेट चाहत्यांविरोधात एमसीएकडून कारवाई केली जाईल किंवा अशा हुल्लडबाज प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढलं जाईल. मात्र अशा हुल्ल्डबाज प्रेक्षकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर सामना सुरु असताना कारवाई करणं पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरु शकतं. 

नक्की वाचा >> हार्दिक पंड्यासाठी Warning! 'मुंबईमध्ये खेळशील तेव्हा...'; रोहितच्या नावाने डिवचण्यावरुन इशारा

रोहित पायउतार झाल्यानंतर पहिलाच सामना

रोहितने मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडल्यानंतर 1 एप्रिल रोजी होणारा मुंबईचा सामना हा होम ग्राऊण्डवरील पहिला सामना ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात रोहित तसेच मुंबईच्या चाहत्यांकडून हार्दिकविरुद्ध घोषणाबाजी, पोस्टरबाजी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहितच मुंबईचा खरा कर्णधार आहे, रोहितच आमच्यासाठी आजही कर्णधार आहे असा अर्थाचे पोस्टर्स मैदानात झळकल्याचं पाहायला मिळालं होतं.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने काय म्हटलं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनने म्हणजेच एमसीएने रविवारी मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याची हुर्यो उडवली जाऊ नये आणि गोंधळ होऊ नये म्हणून विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

2024-03-31T03:48:26Z dg43tfdfdgfd