सर्वाधिक पाच पराभवांनंतर आरसीबी प्ले ऑफमध्ये कशी पोहोचू शकते, जाणून घ्या समीकरण

मुंबई : आरसीबीच्या संघाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आरसीबीचा उत्साह वाढला होता. महिला प्रीमियर लीग आरसीबीने जिंकली होती आणि आरसीबी यावर्षी त्यांचा पुरुष संघ त्या विजयाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा होती. पण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच पराभव त्यांचाच पदरी पडलेले आहेत.

मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबीचा संघ नवव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध या संघाने स्पर्धेतील पहिला सामना खेळला आणि पराभव पत्करावा लागला. आता विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डुप्लेसिस आणि मोहम्मद सिराज सारख्या स्टार्सनी भरलेल्या संघाने ६ सामने खेळले आहेत, पण फक्त एक विजय यांच्या नावावर आहे.

मुंबई इंडियन्सने २७ चेंडू शिल्लक असताना ७ विकेट्स राखून सामना जिंकला आणि ते सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत, तर दोन गुणांसह दिल्ली कॅपिटल्स १० व्या क्रमांकावर आहे. त्यांनी ५ सामन्यात एकच विजय मिळवला आहे. स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे तसतसा प्लेऑफच्या पात्रतेबाबत गुणतालिकेचा थरार वाढत चालला आहे.

कोहलीचा फॉर्म आरसीबीसाठी आशेचा एकमेव किरण आहे. कोहलीने सहा सामन्यांत सर्वाधिक ३१९ धावा करणारा फलंदाज असून तो ऑरेंज कॅपधारक आहे. दुसरीकडे, सामन्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिसने हा पराभव कटू आहे असे म्हटल्याचे पाहायला मिळाले. तो पुढे म्हणाला की, "मुंबई इंडियन्सने चांगला खेळ केला. आमच्यावर दबाव आणला आणि विशेषत: पॉवर प्लेदरम्यान आम्ही बऱ्याच चुका केल्या. आम्हाला माहित होते मैदानावर दव हा एक घटक असेल आणि आम्हाला २५० पेक्षा जास्त धावा करायला हव्या होत्या."

आता ५ पराभवानंतर आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकत असला तरी त्याच्यासाठी अडचणी काहीशा वाढल्या आहेत. मुंबईकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे त्याचा नेट रनरेटही वाईट झाला आहे. आता आरसीबीला अधिक सामने गमावणे परवडणारे नाही, कारण प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा जादुई आकडा म्हणजे १६ गुणांचा असतो. आरसीबीला १६ गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी ९ पैकी ७ सामने जिंकणे आवश्यक आहे. आरसीबीसाठी हे खूप अवघड होताना दिसत आहे. आता आरसीबीचे ९ सामने शिल्लक आहेत आणि त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना सात सामने जिंकावे लागतीत. त्यामुळे आरसीबीसाठी आता प्ले ऑफचे गणित कठीण असल्याचे दिसत आहे.

आरसीबीचा संघ यावर्षी प्ले ऑफमध्ये पोहोचणार का, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना असणार आहे. त्यामुळे आता आरसीबीच्या संघ पुढील सामन्यांत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-12T13:42:54Z dg43tfdfdgfd