हार्दिक पंड्याला भावानेच लावला करोडोंचा चुना, मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई : हार्दिक पंड्याला त्याच्या भावानेच आता करोडो रुपयांना फसवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता हार्दिकच्या भावाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, हार्दिक पंड्याने त्याच्या सावत्र भावाबरोबर एक व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायात सावत्र भावाने हार्दिकला ४.३ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या...

हार्दिकने त्याचा सावत्र भाऊ वैभव याच्याबरोबर एक व्यवसाय सुरु केला होता. हार्दिक, कृणाल आणि त्यांचा सावत्र भाऊ यांनी २०२१ साली तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या अटी अशा होत्या की हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल प्रत्येकी ४० टक्के भांडवल लावतील, तर सावत्र भाऊ वैभव हा २० टक्के निधी या व्यवसायात लावेल. त्याचबरोबर व्यवसाय चालवण्याची संपूर्ण जबाबदारी वैभववर असेल. व्यवसायातून मिळणारा नफाही त्याच प्रमाणात वाटून घेतला जाईल. म्हणजे या व्यवसायातील नफा हा हार्दिकला ४०, कृणालला ४० आणि वैभवला २० टक्के इतका मिळेल.

हार्दिकला वैभवने कसा घातला गंडा

वैभववर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. वैभवने अटींचे उल्लंघन करत हार्दिक आणि कृणालला न कळवता त्याच व्यवसायात आणखी एक फर्म उघडली. एका सूत्राने सांगितले की, यामुळे मुख्य कंपनीचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर वैभवने गुप्तपणे त्याचा नफा २० वरून ३३.३३ टक्क्यापर्यंत वाढवला. ज्यामुळे हार्दिक आणि कृणाल यांचे नुकसान झाले. वैभवने भागीदारी फर्मच्या खात्यातून लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवून एक कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.

हार्दिक पंड्याला दिली धमकी

या सर्व प्रकरणानंतर हार्दिक आणि कृणाल यांनी वैभवशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण वैभवने यावेळी हार्दिक आणि कृणाल यांना धमकी दिली की, तुमची मी सर्वांसमोर बदनामी करेन. त्यानंतर हार्दिक आणि कृणाल पंड्या यांनी वैभववर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कारण सध्याच्या घडीला हार्दिकची पत आयपीएलमध्ये वाढली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला कर्णधार केले आहे. आत्ता कुठे मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या मार्गावर परतला आहे आणि हार्दिकला ट्रोल करणे चाहत्यांनी बंद केले आहे. त्यामध्येच जर वैभवने बदनामी केली असती तर हार्दिक अजून ट्रोल होऊ शकला असता. त्यामुळे हार्दिक आणि कृणाल यांनी वैभववर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकिकडे हार्दिक हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तर कृणाल हा लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळत आहे. यापूर्वी दोघेही अंबानी यांच्या मुंबई इंडियन्समध्ये बराच काळ एकत्र खेळले होते. पण त्यानंतर दोघांनीही संघाला सोडचिठ्ठी दिली होती. पण हार्दिक यावर्षी मुंबई इंडियन्सच्या संघात परतला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-11T07:46:00Z dg43tfdfdgfd