CHAMPIONS TROPHY 2025 : बीसीसीआयचं ठरलं... पाकिस्तानमध्ये भारतीय संघ जाणार की नाही, जाणून घ्या मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत सामना होणार होता. भारत आणि पाकिस्तानचा सामना लाहोर येथे आयोजित केला होता. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत बीसीसीआयची भूमिका सर्वात महत्वाची होती. आज बीसीसीआयने अखेर याबाबतचा निर्णय घेतला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात संघ न पाठवण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जवळपास निश्चित केले आहे. या स्पर्धेतील आपल्या लढती त्रयस्थ देशात खेळवण्यासाठी बीसीसीआय आग्रह धरण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेचे पाक यजमान होते. मात्र, भारताने आपल्या लढती श्रीलंकेत घेण्यास पाकला भाग पाडले होते.

आशिया कप स्पर्धेप्रमाणेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धाही 'हायब्रिड' पद्धतीने घेण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सांगण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स स्पर्धेचा प्राथमिक कार्यक्रम तयार केला आहे. तो मंजुरीसाठी आयसीसीकडे पाठवला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या स्पर्धेद्वारे उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आपल्या देशात पुनरागमन होईल, अशी आशा पाकिस्तान बाळगून आहे. मात्र, भारताने आपल्या लढती श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमीरातीत (यूएई) घेण्यासाठी आग्रह धरला असल्याचे समजते.

भारताचा सहभाग निश्चित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशातील प्रवास कमी करण्याचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रम तयार करताना भारताच्या प्राथमिक साखळी लढती लाहोर, कराची आणि रावळपिंडीत घेणार असल्याची तयारी दाखवली. भारतीय संघ पाकमध्ये खेळणारच नाही, अशी बीसीसीआयची भूमिका आहे.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता धूसर आहे. अर्थात, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असेल. भारतीय संघ पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा 'हायब्रिड' पद्धतीने होईल. भारताच्या लढती श्रीलंका किंवा अमीरातीत होण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयतील सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानचे प्रयत्न

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी आणि चॅम्पियन्स करंडक लढती होणाऱ्या राज्याच्या प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. त्यात संपूर्ण चॅम्पियन्स स्पर्धा पाकिस्तानात होण्यासाठी आमचे प्रय्तन आहेत, असे सांगितले होते. त्यांनी याबाबतचा निर्णय आयसीसीच्या बैठकीत होईल, असे सांगितले होते. ही बैठक जुलैच्या अखेरीस कोलंबोत होणार आहे. आयसीसीच्या स्पर्धा समितीचे प्रमुख ख्रिस टेटली नुकतेच पाक दौऱ्यावर गेले होते. त्यापूर्वी आयसीसीच्या सुरक्षा पथकानेही आढावा घेतला आहे. पाकिस्तान या स्पर्धेच्या निमित्ताने कराची, लाहोर; तसेच रावळपिंडी येथील स्टेडियमचे नूतनीकरण करणार आहे.

पाकची पुन्हा माघार?

गतवर्षीच्या आशिया कप स्पर्धेच्या वेळी भारतीय संघ पाकमध्ये न खेळल्यास पाक वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार नाही, अशी भूमिका पाकने घेतली होती. मात्र, आशिया कप वनडे स्पर्धेतील भारताच्या लढती श्रीलंकेत घेण्यास पाकने मंजुरी दिली. एवढेच नव्हे, तर भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानात येण्याची ग्वाही दिल्यास वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार, असेही पाकने जाहीर केले होते. भारताने कोणतेही आश्वासन दिले नाही, तरीही पाकचा संघ भारतात झालेल्या वर्ल्ड कप वनडे स्पर्धेसाठी आला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-11T18:16:00Z dg43tfdfdgfd