IND VS ENG STATS:भारताचा ऐतिहासिक कसोटी मालिका विजय; क्रिकेटच्या इतिहासात ११२ वर्षानंतर असा विक्रम झाला

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आज संपली. मालिकेतील पहिल्या कसोटीत हैदराबाद येथे भारताचा पराभव झाला होता. इंग्लंडने २८ धावांनी मिळवलेल्या या विजयाने टीम इंडियाला धक्का बसला. भारतीय संघावर टीका झालीच पण त्याच बरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. विराट कोहली नसेल तर भारताचा मालिकेत पराभव होईल अशी देखील चर्चा झाली.

बॅजबॉलने पहिल्या कसोटीत भारताचा परभव केला. इंग्लंडकडे संपूर्ण क्षमतेचा संघ होता. तर भारताकडे नव्या खेळाडूंची ताकद होती. या मालिकेत भारताने ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. पहिल्या कोसटीतील पराभवानंतर भारताने सलग ४ मॅच जिंकून मालिका ४-१ अशी जिंकली. या मालिका विजयासह टीम इंडियाने इतिहास घडवला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ११२ वर्षानंतर अशी घटना घडली आहे. जेव्हा एखाद्या संघाने पहिली मॅच गमवल्यानंतर मालिका ४-१ अशी जिंकली.

भारताच्या आधी कसोटीत अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाने १८९७-९८ साली आणि १९०१-०२ साली इंग्लंडविरुद्ध केली होती. तर इंग्लंडने १९११-१२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. भारताने हैदराबाद कसोटीत पराभव झाल्यानंतर विशाखापट्टणम, राजकोट, रांची, धरमशाला असे सलग ४ विजय मिळवले.

पाचव्या कसोटीत दुसऱ्या डावात १००वी कसोटी खेळणाऱ्या अश्विनने ७७ धावा देत ५ विकेट घेतल्या. भारताने ही कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली.

पहिली मॅच गमावल्यानंतर ४-१ असा विजय मिळवणारे संघ

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १८९७-९८

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १९०१-०२

इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर १९११-१२

भारताचा इंग्लंडवर २०२४

इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि धावांनी विजय मिळवण्याची भारताची ही ८वी वेळ आहे. तर डावाने मिळवलेला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला. २०१६ साली चेन्नई कसोटी भारताने १ डाव आणि ७५ धावांनी विजय मिळवला होता.

भारतीय संघाने आतापर्यंत ५७९ कसोटी सामने खेळले आहेत. आजच्या विजयामुळे भारताचे कसोटीतील विजय १७८ आणि पराभव देखील तितकेच म्हणजे १७८ झाले आहेत. टीम इंडियाचे २२२ सामने ड्रॉ तर एक सामना टाय झाला.

2024-03-09T10:16:33Z dg43tfdfdgfd