SHARDUL THAKUR CENTURY: शार्दूल ठाकूरने मुंबईची लाज वाचवली; षटकार मारून झळकावले वादळी शतक

मुंबई: रणजी ट्रॉफी २०२४ची सेमीफायनल लढत मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या तामिळनाडूने १४६ धावा केल्या. उत्तरादाखल फलंदाजीला आलेल्या मुंबईचा डाव देखील कोसळला. पण नवव्या क्रमांकावर आलेल्या लॉड शार्दूल ठाकूरने अशी कमाल करून दाखवली ज्याचा कोणी विचार केला नव्हता. शार्दूलने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. यामुळे मुंबईचा डाव फक्त सावरला नाही तर त्यांनी आघाडी देखील मिळवली.

भारतीय क्रिकेट संघाकडून तिनही फॉर्मेट खेळणाऱ्या शार्दूलने तामिळनाडूविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये शतकी खेळी केली. त्याने फक्त ९८ चेंडूत शतक पूर्ण केले. शतकाच्या जवळ पोहोचल्यावर शार्दूलने आधी चौकार आणि मग स्टेप आउट करत षटकार मारला आणि शतक पूर्ण केले. शार्दूलने १०५ चेंडूत १०३.८१च्या स्ट्राइक रेटने १०९ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

टॉस जिंकून तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांचा डाव फक्त १४६ धावांवर संपुष्टात आणला. तुषार देशपांडेने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. फलंदाजीला आलेल्या मुंबईकडून मुशीर खान वगळता अन्य फलंदाजांना अपयश आले. आघाडीच्या फलंदाजांनी निराश केल्यानंतर तळातील फलंदाजांनी मात्र कमाल करून दाखवली. मुंबईने १०६ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. त्यानंंतर हार्दिक तोमर आणि शार्दूल यांनी मुंबईने ९८ षटकात ९ बाद ३४३ धावा केल्या असून त्यांच्याकडे १९७ धावांची आघाडी झाली आहे.

शार्दूलचे करिअर

३२ वर्षीय शार्दूल ठाकूरने टीम इंडियासाठी ११ कसोटी, ४७ वनडे आणि २५ टी-२० मॅच खेळल्या आहेत. त्याने कसोटीत ३३१, वनडेत ३२९, टी-२०मध्ये ६९ धावा केल्या आहेत. कसोटी त्याच्या नावावर ३१, वनडेत ६५ तर टी-२० मध्ये ३३ विकेट आहेत.

2024-03-03T12:00:14Z dg43tfdfdgfd