TEAM INDIA WORLD CUP SQUAD: टी-२० वर्ल्डकप संघातून कोणाला डच्चू द्यायचा? IPLमधील कामगिरीने निवड समितीची डोकेदुखी वाढली

नवी दिल्ली: जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील १५ जणांची निवड या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. आयसीसीने संघ जाहीर करण्यासाठी १ मेची मुदत दिली आहे. भारतीय संघात कोणाचा समावेश होते याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. टी-२० वर्ल्डकपच्या आधी आयपीएल सुरू असल्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे.

आयपीएलमधील निम्म्या लढती झाल्या असून काही खेळाडूंच्या कामगिरीवरून काळजी वाढली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा फॉर्म खराब आहे. दुसऱ्या बाजूला विकेटकीपर म्हणून केएल राहुल संजू सॅमसनच्या पुढे गेला आहे. वर्ल्डकपसाठी संघ निवडताना अतिरिक्त जलद गोलंदाज घ्यायचा की फिरकीपटू असा देखील मोठा प्रश्न असेल. त्यात जलद गोलंदाज आवेश खान की वेस्ट इंडिजमधील धीम्या खेळपट्टीचा विचार करून रवी बिश्नोई की अक्षर पटेलची निवड करायची याचा फैसला निवड समितीला करावा लागणार आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांची दिल्लीत बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयसीसीची संघ निवडण्याची मुदत १ मे असल्याने बीसीसीआयला या किंवा पुढील आठवड्यात निर्णय घ्यावा लागले.

हार्दिक पंड्या की शिवम दुबे?

हार्दिकने मुंबईकडून खेळताना ८ सामन्यात १७ ओव्हर टाकल्या आहेत. तर फलंदाजीत त्याला फक्त ७ षटकार मारता आल्या असून तो १५० धावा करू शकला. मात्र सध्या हार्दिक शिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीय. कारण शिवम दुबे गोलंदाजी करताना दिसय नाहीय. गोलंदाजीत दुबे आणि हार्दिकची तुलना होऊ शकत नाही. पण फलंदाजीतील त्याची दमदार कामगिरी नजरेआड करता येणार नाही.

दुसऱ्या विकेटकीपरसाठी राहुल विरुद्ध संजू

आयपीएलमध्ये ऋषभ पंतने १६१च्या स्ट्राइक रेटने ३४२ धावा केल्या आहेत. केएल राहुलने १४१च्या स्ट्राइक रेटने ३०२ तर संजू सॅमसनने १५२च्या स्ट्राइक रेटने ३१४ धावा केल्या आहेत.

गोलंदाजीत कोणाला लॉटरी लागणार?

वर्ल्डकप संघात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचे स्थान जवळ जवळ पक्के आहे. यातील बुमराह आणि कुलदीप वगळता अन्य गोलंदाजांना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. संघात अतिरिक्त गोलंदाजाचा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो. यासाठी आवेश खान, अक्षर पटेल, रवी बिश्नोई यांच्यात स्पर्धा असेल. आवेशने ९च्या इकॉनमीने ८, बिश्नोईने ५, तर अश्ररने सातच्या इकॉनमीने ७ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या फलंदाजीचा स्ट्राइक रेट १३२ इतका आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-25T14:38:46Z dg43tfdfdgfd