अश्विनने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, खेळाडू देत होते खास गोष्ट पण काय घडलं पाहा व्हिडिओ...

धरमशाला : अश्विन आपला १०० वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात एक खास गोष्ट भारतीय संघातील खेळाडू अश्विनला देत होते. पण अश्विनने त्यावेळी एक कृती केली आणि सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले. अश्विनचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला आहे.

अश्विन आपल्या या १०० कसोटीत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. भारताची यावेळी प्रथम गोलंदाजी आली आणि त्यामुळे सर्वांच्या नजरा अश्विनवर होत्या. पण या सामन्यात भारताला दमदार सुरुवात करून दिली ती कुलदीप यादवने. इंग्लंडने अर्धशतकी सलामी दिली असली तरी कुलदीप यादवने त्यानंतर एकामागून एक इंग्लंडला धक्के द्यायला सुरुवात केली. पहिल्या दिवसाच्या चहापानापूर्वी तर कुलदीपने आपले पाच बळी मिळवलेले होते. अश्विन त्यानंतर कुलदीपच्या मदतीला धावून आला होता. कारण त्यानंतर सामन्यात अश्विनच चमक पाहायला मिळाली.

अश्विनने इंग्लंडला एकामागून एक चार धक्के दिले. त्यामुळेच भारताला इंग्लंडच्या संघाला २१८ धावांवर ऑल आऊट करता आले. अश्विनने चार विकेट्स झटपट घेतल्यामुळे भारताला दिलासा मिळाला. त्यामुळे जेव्हा भारतीय संघ पेव्हेलियनमध्ये जात होता, त्यावेळी ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. अश्विनचा हा १०० वा सामना होता, पण कुलदीपने सर्वाधिक पाच बळी मिळवले होते. त्यामुळे पेव्हेलियनमध्ये हा चेंडू घेऊन जाण्याचा मान कोणाला द्यायचा, हे कोणालाही समजत नव्हते. त्यावेळी चेंडू कुलदीपच्या हातामध्ये होता. कुलदीपने हा चेंडू अश्विनला दिला. पण अश्विन हा चेंडू घेण्यासाठी तयार नव्हता. दुसरीकडे कुलदीपही अश्विनला हा सन्मान देऊ पाहत होता. त्यामुळे त्याने सिराजकडे हा चेंडू दिला. सिराजने हा चेंडू अश्विनला दिला. पण कुलदीपचा हा मान मी कसा घेऊ, हे अश्विनच्या मनात बिंबलेले होते. त्यामुळे अश्विन हा चेंडू घेऊन कुलदीपकडे गेला आणि त्याला हा सन्मान दिला. खरं तर अश्विनला हा चेंडू आठवण म्हणून आपल्याकडे ठेवता आला असता. पण अश्विनने असं केलं नाही आणि सर्वांची मनं जिंकली.

अश्विनसाठी हा सामना खास आहेच. पहिल्या डावात त्याने चार बळी मिळवले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या डावात तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-07T10:56:17Z dg43tfdfdgfd