करो या मरो सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात एकमेव मोठा बदल, कोणाला मिळाली संधी पाहा...

मुंबई : करो या मरो सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव बदल केल्याचे हार्दिकने यावेळी जाहीर केले.

टॉस जिंकल्यावर हार्दिकने आपण प्रथम गोलंदाजी का करणार, याचे कारण सांगितले. त्यानंतर या सामन्यात कोणत्या खेळाडूला संधी दिली, हे हार्दिकने स्पष्ट केले. या सामन्यासाठी मोहम्द नबीला संघाबाहेर करण्यात आले असून त्याच्या जागी नमन धीरला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी सोडल्यास मुंबईच्या एकाही गोलंदाजांचा प्रभाव नाही. फलंदाजांच्या अपयशाचा संघास सर्वाधिक फटका संघाला बसला आहे. तिलक वर्मा सोडल्यास मुंबईच्या एकाही फलंदाजाच्या कामगिरीत सातत्य नाही. रोहित शर्माच्या १५८.२९च्या स्ट्राइक रेटने ३१५ धावा; पण मोठ्या खेळी सातत्याने करण्यात अपयश. हेच सूर्यकुमार यादवबाबतही घडत आहे. हार्दिक पंड्या फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी. वर्ल्ड कप संघाचे उपकर्णधारपद किती प्रेरणा देणार, हाही प्रश्नच आहे.

मुंबई इंडियन्सला आज, शुक्रवारी आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. याचवेळी प्ले-ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित असलेल्या कोलकात्यासाठी उणिवा दूर करण्याचे आव्हान असेल.

कोलकात्याचे फलंदाजी आणि गोलंदाजीत अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करण्याकडे लक्ष असते. पंजाबने धावसंख्येचा पाठलाग करताना विक्रम करताना कोलकात्याच्या गोलंदाजीतील उणिवा दाखवल्या होत्या. आक्रमक फलंदाजी ही ताकद; पण त्याच वेळी गोलंदाजी कमकुवत बाजू असल्याचे समोर आले आहे. प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क षटकामागे सरासरी १२ धावा देत आहे. फलंदाजांना पूर्ण अनुकूल खेळपट्टीवर त्याच्या उणिवा जास्तच स्पष्ट दिसत आहेत. हर्षित राणाच्या मोसमात ११ विकेट; पण त्याच्यावरील एका सामन्याच्या बंदीचा मुंबईच्या सामन्यात फटका बसू शकतो. वैभव अरोराकडून या परिस्थितीत सरस कामगिरीची आशा असेल. रिंकू सिंह आपल्यावरील अन्याय खेळातून दाखवण्यास उत्सुक असेल, असे म्हटले जात आहे.

मुंबई वि. कोलकाताठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई

प्रक्षेपण ः संध्याकाळी ७.३० पासून स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

स्पर्धेतील कामगिरी ः मुंबईचे १० सामन्यांत तीन विजय. गुणतक्त्यात नवव्या स्थानी. निव्वळ धावगती -०.२७२. कोलकात्याचे नऊ सामन्यांत सहा विजय. गुणतक्त्यात दुसरे. निव्वळ धावगती १.०९६

गेल्या पाच सामन्यांत ः मुंबईचे चार पराभव आणि एक विजय, कोलकात्याचे तीन विजय आणि दोन पराभव.

एकमेकांविरुद्ध ः मुंबईचे ३२ लढतींत २३-९ असे वर्चस्व. गेल्या पाच सामन्यांत कोलकात्याचे तीन विजय, तर मुंबईचे दोन. यापूर्वीच्या लढतीत मुंबईची सरशी.

हवामानाचा अंदाज ः सामन्याच्या वेळी तापमान ३० अंशाच्या आसपास अपेक्षित. आर्द्रता ५० टक्क्याच्या आसपास असू शकेल. उकाड्याचा त्रास होऊ शकतो.

खेळपट्टीचा अंदाज ः प्रामुख्याने फलंदाजांनाच साथ देणारी खेळपट्टी. चेंडू बॅटवर चांगला येतो; तसेच सीमारेषाही तुलनेत जवळ. त्यामुळे दोनशेचा पाठलाग शक्य होतो. अर्थात, दवामुळे प्रतिस्पर्धी धावांच्या पाठलागास पसंती देण्याची शक्यता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T13:55:45Z dg43tfdfdgfd