चेन्नई: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४मधील पहिली मॅच एमए चिदंबरम स्टेडियमवर झाली. या सामन्यात ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृत्व करत होता. महेंद्र सिंह धोनीने हंगाम सुरू होण्याच्या एक दिवस आधी गायकवाडकडे नेतृत्व सोपवले. पहिल्या सामन्यात गायकवाडने चेन्नईला ६ विकेटनी विजय मिळून दिला. हा विजय ऋतुराजसाठी स्पेशल असा ठरणार आहे. या विजयानंतर त्याने व्यक्त केलेल्या भावा देखील खास अशा होत्या.
चेपॉकवर झालेल्या सामन्यात बेंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि चेन्नईसमोर विजायसाठी १७४ धावांचे लक्ष्य दिले. चेन्नईने विजयाचे लक्ष्य १८.४ षटकात आणि ४ विकेटच्या मोबदल्यात पार केले.
कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्याचा आनंद ऋतुराजच्या चेहऱ्यावर दिसत होता. मॅच झाल्यानंतर तो म्हणाला, काही २-३ ओव्हर बाजूला केले तर संपूर्ण नियंत्रण होते. अजून १० ते १५ धावा कमी असत्या तर छान झाले असते. पण त्यांनी अखेरच्या षटकात चांगली फलंदाजी केली. फाफ आणि मॅक्सवेल यांना बाद करणे हा महत्त्वाचा क्षण ठरला. आम्हाला लवकर ३ विकेट मिळाल्या ज्यामुळे काही षटकते नियंत्रण मिळवू शकलो.
नेतृत्वाबद्दल विचारले असता ऋतुराज म्हणाला, मी नेहमीच आनंद घेतला आहे. कधीच अतिरिक्त दबाव घेतला नाही. कर्णधारपदाचा अनुभव कसा असतो हे याआधी हाताळले आहे. मी कधीच दबाव घेतला नाही. बाकी माझ्याकडे माही भाई देखील आहेच.
अजिंक्यचे कौतुक
ऋतुराज गायकवाडने संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. मला वाटते की आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू हा नैसर्गिक स्ट्रोकप्लेयर आहे. माझ्यामते अजिंक्य फार सकारात्मक खळतोय. प्रत्येकाला त्याची जबाबदारी माहिती आहे. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचे आहे आणि कोणाला नाही. आपल्याला नेमके काय करायचे आहे ही गोष्ट माहित असली की गोष्टी सोप्या होतात. अजून २-३ गोष्टींवर काम करायचे आहे. सर्वांनी चांगली फलंदाजी केली. मला वाटते टॉप ३ फलंदाजांपैकी एकाने १५ ओव्हरपर्यंत फलंदाजी केली तर अधिक सोपं झाले असते. या सामन्यात ऋतुराजला फार मोठी खेळी करता आली नाही. त्याने १५ चेंडूत ३ चौकारासंह फक्त १५ धावा केल्या.
2024-03-23T09:22:17Z dg43tfdfdgfd