कुस्तीतील ‘मस्ती’ थांबणार का? भारतीय कुस्तीत नेमके काय सुरू आहे, जाणून घ्या...

गोपाळ गुरव : भारतीय कुस्तीसाठी नियुक्त करण्यात आलेली हंगामी समिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बरखास्त केली. या हंगामी समितीची आता गरज नाही, असे ‘आयओए’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कुस्तीवर भारतीय कुस्ती महासंघाचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहे.

गेल्या काही काळापासून भारतीय कुस्ती महासंघ, भारतीय मल्ल, क्रीडा मंत्रालय, जागतिक कुस्ती महासंघ, सर्वोच्च न्यायालय अशा सर्व गोष्टींभोवती सध्या ‘भारतीय कुस्ती’ फिरते आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट या सर्व मल्लांनी आंदोलन केल्यापासून भारतीय कुस्तीमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ सुरू होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, तरीही भारताच्या केवळ एकाच मल्लाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवता आले आहे. भारतीय कुस्तीची का माती झाली, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचे खरे कारण म्हणजे कुस्तीतील राजकारण.

माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीगिरांवर लैंगिक अत्याचार केले. यामुळे ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट या कुस्तीगिरांनी त्यांच्याविरोधात मोठे आंदोलन केले होते. अगदी या लोकांनी आपले पदकही परत करण्याचा निर्णय घेतला होता. राजकीय नेत्यांपासून खेळाडू, कलाकार यांनी यात उड्या घेतल्याने आंदोलन चांगलेच पेटले होते. यानंतर निवडणूक निश्चित कालावधीत न घेतल्याने आंतरराष्ट्रीय कुस्तीची सर्वोच्च संघटना ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ने गेल्या वर्षी २३ ऑगस्टला भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झाली होती. त्यात अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. मात्र, क्रीडा मंत्रालयाने ही निवडणूक बेकायदा ठरविली होती. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हंगामी समितीची स्थापना केली होती. ही समिती संजय सिंह यांना अमान्य होती. यानंतर १३ फेब्रुवारीला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठविली होती. तेव्हापासून संजय सिंह यांनी आम्हीच अधिकृत संघटना असल्याचे जाहीर केले आहे. क्रीडा मंत्रालयाने गेल्या वर्षी भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हंगामी समितीची नियुक्ती करण्यात आली होती.

क्रीडा मंत्रालयाचा निर्णय बाकी

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हंगामी समिती बरखास्त केली असली, तरीही क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय कुस्ती महासंघाबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. क्रीडा मंत्रालयाकडून महासंघावरील बंदी कायम आहे. ‘गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती. बंदी उठवत असल्याचा आदेश मंत्रालयाने अद्याप जारी केलेला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आयओएने हंगामी समिती का बरखास्त केली, याचे मात्र सर्वांना आश्चर्य वाटत आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यावेळी म्हणाली की, " निवडणूक जिंकलो, त्यादिवसापासून अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट माझ्याकडे होता. मर्यादा असताना, मी कुस्तीसाठी शक्य ते सारे काही केले. पुण्यात राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे, अधिकारी पुरविणे. हंगामी समितीला मदत करणे, असे सारे काही केले. आशा आहे, आता आमचा संघर्ष थांबेल."

2024-03-20T15:00:54Z dg43tfdfdgfd