केकेआरच्या खेळाडूंनी मुंबईच्या सामन्यापूर्वी रात्र का घालवली वाराणसीत, खरं कारण आलं समोर...

गोपाळ गुरव : कोलकाता नाइट रायडर्स संघ यंदाच्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक संघ म्हणून कोलकात्याकडे बघितले जात आहे. कोलकात्याने अकरापैकी आठ सामने जिंकले आहेत. मात्र, याच कोलकात्या संघातील खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी एक रात्र चक्क वाराणसीत काढावी लागली.

कोलकात्याने रविवारी पाच मे रोजी लखनौ संघावर ९८ धावांनी मात केली. यामध्ये कोलकात्याने ६ बाद २३५ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर लखनौला १३७ धावांत गुंडाळले. हा विजय मिळवून कोलकाता संघ गुणतक्त्यात अव्वल क्रमांकावर पोहोचला. ही लढत लखनौमध्येच झाली. ही लढत संपवून कोलकाता संघ सोमवारी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कोलकात्याला रवाना झाला. त्यांचे विमान सायंकाळी ७.२५ वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, खराब हवामानामुळे चार्टर फ्लाइटमध्ये असलेल्या खेळाडूंचे धाबे दणादणले. हे विमान कोलकात्यात उतरूच शकणार नव्हते. त्यामुळे ते पहिल्यांदा गुवाहाटीकडे वळविण्यात आले. मात्र, तेथेही विमान उतरू शकले नाही. पुढे ते वाराणसीकडे वळविण्यात आले.

वाराणसीमध्ये जाणार असल्याचे समजल्यावर खेळाडूंमध्येही चलबिचल सुरू झाली होती. कोलकात्याच्या मीडिया टीमने रात्री ८.४६ वाजता नेमके काय झाले, त्याबाबत सांगितले. त्यांनी सुरुवातीला सांगितले की कोलकात्यात वातावरण खराब आहे. त्यामुळे आम्ही विमान गुवाहाटीकडे वळविले आहे. यानंतर रात्री ९.४३ वाजता पुन्हा सांगण्यात आले की आम्ही गुवाहाटीवरून कोलकात्याकडे येऊ शकतो. आम्हाला साधारण रात्रीचे अकरा वाजणार आहेत. अर्थात, ही सगळी माहिती बाहेरच्या लोकांसाठी होती.

बरेच प्रयत्न करूनही त्यांची फ्लाइट काही लँड होऊ शकली नाही. मग मोर्चा वाराणसीकडे वळविण्यात आला. यानंतर पहाटे सव्वा वाजता सांगण्यात आले, की गुवाहाटीवरून फ्लाइट कोलकात्याला रात्री अकरा वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, खूप वेळा प्रयत्न करूनही खराब हवामानामुळे आम्ही विमान धावपट्टीवर उतरवू शकलो नाहीत. आता आम्ही विमान वाराणसीकडे वळवत आहोत आणि नुकतेच तेथे पोहोचलो आहोत.

इकडे सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. विमान हवेतच हेलकावे खात होते. अखेर वाराणसीत पोहोचल्यावर खेळाडूंना श्वास सोडला. मात्र, त्यांना रात्र वाराणसीतच काढावी लागली. मध्यरात्री तीन वाजता कोलकात्याच्या मीडिया टीमने सांगितले, की आता आम्ही वाराणसीच्या हॉटेलमध्ये थांबत आहोत. मंगळवारी दुपारी आम्ही कोलकात्यासाठी उड्डाण करणार आहोत.

कोलकात्याची पुढील लढत मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ मे रोजी इडन गार्डन्सविरुद्ध होणार आहे. मात्र, या खेळाडूंची या विमान प्रवासात चांगलीच दमछाक झाली. त्यात कुटुंबीयांनाही टेन्शन आले होते. मात्र, सर्वच जण सुखरूप पोहोचल्यानंतर घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, रात्री तीन वाजेपर्यंत सारेच जण टेन्शनमध्ये होते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-07T16:41:03Z dg43tfdfdgfd