खेळापेक्षा कोणीही मोठा नाही, रोहित शर्माला कर्नलांचा पाठिंबा, म्हणाले-ही गोष्ट लक्षात ठेवा...

पुणे : रोहित शर्माने चौथ्या कसोटी सामन्यानंतर काही खेळाडूंना चांगलेच धारेवर धरले होते. त्याचबरोबर आता संघात कोणाला संधी देणार नाही, हे स्पष्ट केले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेटमधील कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी रोहित शर्माला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. खेळापेक्षा कोणाताही खेळाडू कधीच मोठा नसतो, असे त्यांनी म्हटले आहे.

"यशाची भूक असलेल्यांनाच आम्ही संघात स्थान देऊ. कोणाला कसोटीत खेळायचे आहे आणि कोणाला नाही, हे आम्हाला लगेच कळते", असे म्हणत रोहितने ईशन किशन आणि श्रेयस अय्यरला इशारा दिला होता. "रोहितच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. देशांतर्गत स्पर्धेत खेळल्यानंतर तुम्हाला चांगल्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव होतो. त्यामुळे सर्वच कसोटीपटूंनी देशांतर्गत क्रिकेट, खासकरून रणजी स्पर्धेला प्राधान्य द्यायला हवे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेट खेळतो, तेव्हा त्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरत असतो. मैदानावर प्रत्यक्ष सामन्यादरम्यान त्याच्या अनुभवाचा फायदाही होत असतो. हे अनुभव युवा खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणारे ठरतात. मुंबई क्रिकेट यामुळेच मजबूत होते', असे सांगायलाही कर्नल विसरले नाहीत.

"रणजी स्पर्धा खेळणे खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या खेळाडूला खेळायचे नसले, तर त्याच्याविना संघाचे काही अडत नाही. उलट इतरांना संधी मिळते. मात्र, या सर्वांनी लक्षात ठेवावे, खेळापेक्षा कोणीही मोठे नाही", असे परखड मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे रणजी क्रिकेट खेळण्यास टाळाटाळ करत होते. त्यांना आता रोहितनंतर वेंगसरकर यांनी चांगलेच सुनावले आहे. श्रेयस अय्यरने आता रणजी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण इशान किशन मात्र रणजी स्पर्धा खेळलेला नाही. त्यामुळे त्याला आता भारतीय संघाल स्थान मिळणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.

वेंगसरकर यांनी २६० प्रथम श्रेणी सामन्यांत ५२.८६च्या सरासरीने १७ हजार ८६८ धावा केल्या आहेत. यात ५५ शतके आणि ८७ अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धची रांची कसोटी जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेट आणि रणजी क्रिकेटची टाळाटाळ करणाऱ्या खेळाडूंची नावे न घेता खडे बोल सुनावले होते.

2024-02-28T06:34:18Z dg43tfdfdgfd