तो एक सामना माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला, १०० व्या कसोटीपूर्वी अश्विनने सांगितले रहस्य

धरमशाला : भारताचे माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे निवृत्त झाले होते. हरभजनसिंग कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात होता. अमित मिश्रा, प्रज्ञान ओझा अंतिम संघातील स्थान राखण्यासाठी प्रयत्न करीत होते. भारताला एक चांगला फिरकी गोलंदाज हवा होता. २००९च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने रविचंद्रन अश्विनला संघात स्थान दिले. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्याने २०१०मध्ये वनडे, तर २०११मध्ये कसोटी पदार्पण केले. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचवी लढत अश्विनची शंभरावी कसोटी असेल.

शंभर कसोटी खेळणारा अश्विन भारताचा चौदावा खेळाडू ठरणार आहे. शंभराव्या कसोटीपूर्वीच पाचशेहून अधिक विकेट घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी मुथय्या मुरलीधरनकडून झाली होती. शंभराव्या कसोटीपूर्वी तीन हजारांहून अधिक धावा आणि तीनशेहून अधिक विकेट घेणारा अश्विन पाचवा गोलंदाज. याआधी अशी कामगिरी इयान बोथम, कपिलदेव, डॅनिएल व्हिटोरी, शॉन पोलॉक यांच्याकडून झाली होती. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन नवव्या क्रमांकावर आहे.

अश्विन म्हणाला की, " आतापर्यंतचा कसोटी प्रवास अविस्मरणीय आणि विशेष राहीला आहे. भारतातील २०१२मधील इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका कारकिर्दीसाठी टर्निंग पॉइंट ठरला. माझ्या गोलंदाजीत काय सुधारणा हव्यात, हे मला त्या मालिकेने शिकवले. त्यानंतर २०१८-१९च्या इंग्लंड दौऱ्यातील बर्मिंगहॅम कसोटीतील सात विकेट ही सर्वोत्तम कामगिरीपैकी एक असल्याचे मला वाटते. स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन, जो रूटला सारख्या फलंदाजांना मला गोलंदाजी करायला आवडते."

अश्विन पुढे म्हणाला की, " मी टी-२० क्रिकेटमधून आलेला गोलंदाज आहे, असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा थोडे विचित्र वाटते. टी-२०त प्रवेश करण्याआधी मी ३०-४० प्रथम श्रेणी सामने खेळलो होतो. त्यानंतर २०११मध्ये माझे कसोटीत पदार्पण झाले. चेन्नईत मी तीन ते चार मोसम क्लब क्रिकेट खेळलो आहे."

इंग्लंडचा फलंदाज जो रूट अश्विनबाबत म्हणाला की, " अश्विनचे फलंदाजाला बाद करण्याच्या प्रयत्नातच असतो. तो खूप हुशारीने गोलंदाजी करतो. त्याच्याविरुद्ध खेळताना तुम्हाला पदलालित्य उत्तम राखावे लागते. थोडा जरी आळशीपणा होत असेल, तर ते त्याच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही. अश्विनला भारतात खेळणे आव्हानात्मक होऊन बसते."

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा अश्विनबाबत म्हणाला की, " इतर गोलंदाजांच्या तुलनेत अश्विन चेंडूला अधिक उसळी देतो. त्याचे फलंदाजांच्या हालचालींवर बारीक लक्ष असते. फलंदाजांना चुका करण्यास तो भाग पाडतो. प्रत्येक चेंडू टाकताना तो भरपूर मेहनत घेतो. खेळपट्टी कशीही असो, तो चिकाटी सोडत नाही."

2024-03-06T10:53:34Z dg43tfdfdgfd