...तरच ऋषभ पंत टी-२० वर्ल्ड कप खेळू शकतो, बीसीसीआयने कोणती अट ठेवली पाहा...

नवी दिल्ली : ऋषभ पंतचा गंभीर अपघात झाला होता, पण यामधून तो आता सावरत आहे. पण पंत टी-२० वर्ल्ड खेळू शकणार की नाही, याबाबत आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी अपडेट दिली आहे. पंतला संघात यायचे असेल, तर त्यासाठी आता एक मोठी अट बीसीसीआयने ठेवल्याचे समोर आले आहे.

ऋषभ पंतच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. यामध्ये पंतला जबर मार लागला होता. त्यानंतर पंत हा आतापर्यंत मैदानात उतरू शकलेला नाही. पंत आयपीएलमध्ये खेळू शकतो, असे आता म्हटले जात आहे. पण पंत हा टी-२० वर्ल्ड कप खेळू शकणार की नाही, याबाबतची मोठी बातमी आला समोर आली आहे. बीसीसीआयने खेळाडूंना संघात परतण्यासाठी काही नियम बनवले आहेत. या नियमानुसारच खेळाडूंना संघात कमबॅक करता येणार आहे.

याबाबत जय शाहा यांनी सांगितले की, " ऋषभ पंत हा भारतीय संघासाठी एक मोठा खेळाडू आहे. पण जर पंतने यष्टीरक्षण केले तरच त्याला टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. काही दिवसांतच आयपीएल सुरु होणार आहे. आयपीएलमध्ये पंत कशी कामगिरी करतो, यावर आमची नजर असेल. त्याने जर आयपीएलमध्ये यष्टीरक्षण केले तरच त्याला भारताच्या टी-२० वर्ल्ड कपसाटी निवडण्यात येणाऱ्या संघात स्थान मिळू शकते."

पंत गेल्या काही दिवसांपासून सराव करत आहे. पण तो यष्टीरक्षण करणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. कारण पंतला अपघातामध्ये जबर दुखापत झाली होती. यष्टीरक्षण करण्यासाठी जास्त फिटनेस लागतो. त्यामुळे पंत आता यष्टीरक्षणासाठी फिट ठरतो की नाही, हे पाहिले जाईल. पंतने जर यष्टीरक्षण केले नाही तर त्याला भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे जय शाह यांनी आता स्पष्ट केले आहे.

आयपीएलमध्ये पंत हा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. यावेळी त्याच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-11T13:22:14Z dg43tfdfdgfd