दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल, राजस्थानवर साकारला दमदार विजय

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर २० धावांनी विजय साकारला आणि त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावा केल्या होत्या. राजस्थानचा संघ २२२ धावांचा पाठलाग करायला उतरला आणि संजू सॅमसनने ८६ धावांची खेळी साकारत दिल्लीच्या गोलंदाजीला चांगलेच धारेवर धरले होते. पण संजूचाअप्रितम झेल शाई होपने पकडला आणि तिथेच हा सामना दिल्लीच्या पारड्यात झुकला. या विजयासह दिल्लीच्या संघाचे १२ गुण झाले आहेत. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये आता १२ गुण हे दिल्लीसह चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि सनराझर्स हैदराबाद या संघांचेही आहेत. त्यामुळे आता पॉइंट्स टेबलमध्ये चांगलीच रंगत वाढलेली आहे.

दिल्लीच्या २२२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाची चांगली सुरुवात झाली नाही. कारण राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या चेंडूंवर यशस्वी जैस्वालच्या रुपात पहिला धक्का बसला. यशस्वीला चार धावाच करता आल्या. त्यानंतर जोस बटलर हा १९ धावांवर बाद झाला, तर रायन पराग हा २७ धावांवर बाद झाला. पण यावेळी आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने हा सामना जीवंत ठेवला होता. संजूने यावेळी २८ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले आणि सामन्यात चांगलीच रंगत भरली. संजी यावेळी शतकासह राजस्थानला विजय मिळवून देईल, असे वाटले होते. पण संजूचा अप्रितम झेल यावेळी शाई होपने पकडला आणि राजस्थानला मोठा धक्का बसला. संजूने यावेळी ४६ चेंडूंत ८ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ८६ धावांची खेळी साकारली.

संजू बाद झाला तरी फलंदाजीला आलेल्या रोवमन पॉवेल आणि खेळपट्टीवर सेट झालेल्या शुभम दुबे यांनी काही काळ गोलंदाजीचा प्रतिकार केला. पण त्यावेळी सामना दिल्लीच्या पारड्यात झुकेल असे, वाटत होते आणि तसेच घडले. दिल्लीच्या गोलंदाजांनी त्यानंतर दमदार गोलंदाजी करत विजय साकारला.

दिल्लीच्या संघाला यावेळी अभिषेक पोरेल आणि जॅक फ्रेझर मॅगग्रेक यांनी तुफानी सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून दिल्लीच्या संघाला ६४ धावांची सलामी दिली. या ६४ धावांमध्ये जॅकचे अर्धशतक असल्याचे पाहायला मिळाले. जॅकने यावेळी फक्त २० चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. जॅक बाद झाला आणि त्यानंतर पोरेलने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. पोरेलने यावेळी अर्धशतक झळकावले आणि संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. पोरेलने यावेळी सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३६ चेंडूंत ६५ धावांची खेळी साकारली. त्यानंतर अखेरच्या षटकांत स्ट्रिस्टीन स्टब्सने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २० षटकांत ४१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे दिल्लीच्या संघाला यावेळी २२१ धावा करता आल्या.

राजस्थानच्या संघाकडून यावेळी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या त्या रवीचंद्रन अश्विनने. युजवेंद्र चहलने यावेळी फक्त एक बळी मिळवला, पण त्यासह त्याने इतिहास रचला. कारण ऋषभ पंत हा त्याचा ३५० वा बळी ठरला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-07T18:11:05Z dg43tfdfdgfd