दिल्लीने मुंबई इंडियन्सला दिला मोठा धक्का, सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय पाहा

अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने गुजरात टायटन्सवर दमदार विजय साकारला खरा, पण या विजयानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला आहे. हा सामना संपला आणि त्यानंतर दिल्लीने मुंबई इंडयन्सला कसा धक्का दिला, ते पाहायला मिळाले.

दिल्लीच्या संघाने यावेळी गुजरातची त्यांच्याच घरात लाज काढली. कारण दिल्लीने सुरुवातीला गुजरातचा ८९ धावांच खुर्दा उडवला. गुजरातची ही आयपीएलमधील निचांकी धावसंख्या ठरली. दिल्लीने त्यानंतर धमाकेदार फटकेबाजी केली आणि दणदणीत विजय साकारला. पण दिल्लीचा आनंद यावेळी द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले. कारण दिल्लीच्या संघाने फक्त गुजरातलाच धक्का दिला नाही तर त्यांनी मुंबई इंडियन्सलाही हादरवले.

या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव पत्करावा लागला होता, नाही तर त्यांचे सलग तीन विजय झाले असते. दिल्लीच्या या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा सामने झाले होते. या सहा सामन्यांत मुंबई आणि दिल्ली यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले होते, त्याचबरोबर मुंबई आणि दिल्ली या संघाला चार पराभव पत्करावे लागले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचे समान गुण होते. पण दोन्ही संघाचे समान ४ गुण असले तरी रनरेटच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा संघ हा आठव्या स्थानावर होता आणि दिल्लीचा संघ हा नवव्या स्थानावर होता. पण दिल्लीच्या संघाने यावेळी गुजरातच्या संघावर दणदणीत विजय साकारला. या विजयासह दिल्लीच्या संघाचे दोन फायदे झाले. पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीच्या संघाला दोन गुण मिळाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीच्या संघाचा रन रेट चांगलाच वाढला. या सामन्यापूर्वी दिल्लीचा रन रेट -०.९७५ असा होता, पण या सामन्यानंतर त्यांचा रन रेट हा -०.०७ असा झाला. त्याचबरोबर या दोन गुणांसह दिल्लीच्या संघाने मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले आहे. कारण या दोन गुणांसह दिल्लीच्या संघाने सहावे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला हा एक मोठा धक्का असेल.

दिल्लीने यावेळी फक्त मुंबई इंडियन्सला मागे टाकले नाही, तर त्यांनी मुंबईसह पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या तिन्ही संघांना एकाच सामन्यात पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे एकाच दगडात दिल्लीच्या संघाने तीन शिकार केल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीसाठी हा विजय सर्वात महत्वाचा ठरेल. कारण या विजयाने त्यांना गुणतालिकेत चांगलीच बढती मिळाली आहे आणि ते थेट ९ व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

दिल्लीच्या संघाला आता विजयात सातत्य राखता येते की नाही, यावर त्यांचे प्ले ऑफचे गणित अवलंबून असेल. त्यासाठी दिल्लीच्या संघाला आपला हा फॉर्म कायम ठेवावा लागणार आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ यापुढे कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-17T17:09:34Z dg43tfdfdgfd