भारतीय कुस्तीची का झाली माती... जाणून घ्या असं घडलं तरी काय

गोपाळ गुरव : भारतीय कुस्ती महासंघ, भारतीय मल्ल, क्रीडा मंत्रालय, जागतिक कुस्ती महासंघ, सर्वोच्च न्यायालय अशा सर्व गोष्टींभोवती सध्या ‘भारतीय कुस्ती’ फिरते आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश या सर्व मल्लांनी आंदोलन केल्यापासून भारतीय कुस्तीमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ सुरू आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, तरीही भारताच्या केवळ एकाच मल्लाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवता आले आहे. भारतीय कुस्तीची का माती झाली, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचे खरे कारण म्हणजे कुस्तीतील राजकारण. माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीगिरांवर लैंगिक अत्याचार केले. यामुळे ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट या कुस्तीगिरांनी त्यांच्याविरोधात मोठे आंदोलन केले होते. अगदी या लोकांनी आपले पदकही परत करण्याचा निर्णय घेतला होता. राजकीय नेत्यांपासून खेळाडू, कलाकार यांनी यात उड्या घेतल्याने आंदोलन चांगलेच पेटले होते. यानंतर निवडणूक निश्चित कालावधीत न घेतल्याने आंतरराष्ट्रीय कुस्तीची सर्वोच्च संघटना ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ने गेल्या वर्षी २३ ऑगस्टला भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झाली होती. त्यात अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. मात्र, क्रीडा मंत्रालयाने ही निवडणूक बेकायदा ठरविली होती. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हंगामी समितीची स्थापना केली होती. ही समिती संजय सिंह यांना अमान्य होती. यानंतर १३ फेब्रुवारीला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठविली होती. तेव्हापासून संजय सिंह यांनी आम्हीच अधिकृत संघटना असल्याचे जाहीर केले आहे.

आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय मल्ल पात्र ठरावेत, यासाठी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मल्ल पाठवणे गरजेचे आहे. मात्र, भारतीय कुस्ती महासंघ अधिकृत नसल्याच्या कारणास्तव बजरंग, विनेश पात्रता स्पर्धेत सहभागी होत नाहीत. दुसरीकडे, साक्षीने या सर्वांना कंटाळून निवृत्ती घेतली आहे. या निवड चाचण्यांविरोधात बजरंग, साक्षी हे कोर्टात गेले होते.

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघ पाठवण्याचा अधिकार केवळ भारतीय कुस्ती महासंघासच आहे. त्यांच्या वतीने अन्य कोणीही हे काम करू शकणार नाही, असे जागतिक कुस्ती महासंघाने स्पष्ट केले. आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा घेण्याचे आधिकार दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या हंगामी समितीकडे दिले आहेत. त्यानंतर काही तासांतच जागतिक महासंघाने भूमिका स्पष्ट केली.

जागतिक महासंघाची भूमिका आणि दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय यात आता भारतीय कुस्तीची कोंडी होणार आहे. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा १९ ते २१ एप्रिल दरम्यान होईल. त्यासाठी निवड चाचणी कधी होणार हा प्रश्न आहे. हंगामी समितीने पुरुषांसाठी सोनिपतला आणि महिलांसाठी पतियाळात चाचणी होईल, असे जाहीर केले आहे. ही चाचणी १० आणि ११ मार्चला होणार असल्याचेही जाहीर केले आहे.

2024-03-11T13:52:20Z dg43tfdfdgfd