भारतीय संघ ठरला जगात भारी, विजयासह रोहित ब्रिगेडने क्रिकेट विश्वात रचला इतिहास

दिगंबर शिंगोटे : भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर विजय मिळवला, कसोटी मालिकाही जिंकली. त्याचबरोबर भारताने या विजयासह इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंत अशी देदिप्यमान कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. भारतीय संघाने मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर पाच विकेटनी मात केली आणि मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडीही घेतली. यासह भारतीय संघाने अद्वितीय कामगिरी केली आहे.

इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड या संघांतील पाच कसोटींच्या मालिकेतील पहिल्या लढतीत इंग्लंडने २८ धावांनी बाजी मारली होती. अर्थात, इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, भारतात भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे सोपे नाही, हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले. भारताने मालिकेती दुसरी कसोटी १०६, तिसरी कसोटी ४३४ धावांनी जिंकली आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. चौथी अर्थात रांची कसोटी जिंकून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक होता, तर दुसरीकडे इंग्लंडला मालिकेत बरोबरीची अपेक्षा होती. तशी इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडीही मिळवली होती. मात्र, रांची कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीसमोर १४५ धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय संघासमोर १९२ धावांचे आव्हान आले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हे आव्हान सोपे नव्हते. कर्णधार रोहित शर्माच्या ५५ धावांनंतरही भारताची ५ बाद १२० अशी स्थिती झाली होती. मात्र, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा विजय साकारला.

यासह भारताने मायदेशात एक-दोन नव्हे तर सलग सतरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मायदेशात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर, २०१३मध्ये मायदेशात भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-० असे हरवून आपल्या मोहिमेला प्रारंभ केला. त्यासह आतापर्यंत मायदेशात भारतीय संघाने सलग सतरा कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यात भारताने इंग्लंडविरुद्ध तीन, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन, न्यूझीलंडविरुद्ध दोन, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन, वेस्ट इंडिजविरुद्ध दोन, श्रीलंकेविरुद्ध दोन, तर बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर भारताने अफगाणिस्तानविरुद्ध एकदा बाजी मारली आहे. मायदेशात आतापर्यंत एकाही संघाला सलग सतरा कसोटी मालिका जिंकता आलेल्या नाहीत. याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने मायदेशात सलग दहा कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

भारताने सलग १७ कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या शिरपेचात आता एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

2024-02-27T05:16:36Z dg43tfdfdgfd