मुंबई इंडियन्सचा हा मोठा विक्रम अजूनही कोणाला मोडता आला नाही, रोहितचा प्रयोग ठरला यशस्वी

मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स एक मोठा विक्रम असा आहे जो कोणत्याही संघाला अजूनपर्यंत मोडता आलेला नाही. रोहित शर्माने या सामन्यात एक प्रयोग केला होता आणि तो चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सला हा मोठा विक्रम रचता आला होता.

रोहित शर्माने कोणता प्रयोग केला होता...

रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सलामीवीरही आहे. रोहितने आतापर्यंत संघाला दमदार सलामी करून दिली आहे. पण रोहित शर्माने या सामन्यात एक प्रयोग केला होता. रोहितने या सामन्यात लिंडेल सिमोन्सला सलामीला पाठवले होते. सिमोन्सने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत ६६ धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्माने अजून एक प्रयोग केला होता. रोहितने या सामन्यात कायरन पोलार्डला तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी बढती दिली होती. पोलार्डने यावेळी तुफानी फटकेबाजी केली आणि ३५ चेंडूंत नाबाद ६३ धावांची खेळी साकारली होती. या दोघांच्या धमाकेदार फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २१२ अशी मजल मारता आली होती.

मुंबई इंडियन्सचा कोणता विक्रम अजूनही अबाधित आहे, जाणून घ्या...

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा सामना २०१७ साली झाला होता. मुंबई इंडियन्सने या सामन्यात दिल्लीपुढे २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव हा फक्त ६६ धावांत आटोपला होता. यावेळी मुंबई इंडियन्सकडून हरभजन सिंग आणि कर्ण शर्मा या दोघांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले होते. त्यामुळेच मुंबई इंडियन्सला दिल्लीवर १४६ धावांनी मोठा विजय मिळवता आला होता. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या धावांच्या फरकाने कोणत्याही संघाला अजूनपर्यंत तरी विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा हा विक्रम अजूनही आयपीएलच्या इतिहासात अबाधित आहे. या सामन्यात सिमोन्सला सामनावीर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. कारण या सामन्यात त्याने ६६ धावा तर केल्याच होत्या, त्याचबरोबर त्याने दोन झेलही टिपले होते. त्यामुळे त्या या लढतीत सामनवीर हा पुरस्कार देण्यात आला होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीच्या संघाचा कर्णधार हा झहीर खान होता, जो आता मुंबई इंडियन्सचा सहाय्यक प्रशिक्षक आहे.

मुंबई इंडियन्स आणि त्यांचे चाहते हा सामना कधीच विसरणार नाहीत. कारण मुंबईचा हा सर्वात मोठा विजय होता. या विजयानंतर मुंबईच्या संघाने जोरदाप सेलिब्रेशनही केले होते. कारण दिल्लीच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात मुंबईने धुळ चारली होती.

2024-03-21T08:32:39Z dg43tfdfdgfd