मुंबई इंडियन्सच्या संघात एकमेव मोठा बदल, हार्दिकने पाहा कोणत्या खेळाडूला दिली संधी

मुंबई : करो या मरो सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे आणि हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर हार्दिकने या सामन्यात एक मोठा बदल केल्याचे सांगितले.

या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव मोठा बदल करण्यात आला आहे. या संघात अंशुल कंबोज या युवा वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील प्ले-ऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता मुंबई संघ इतर संघांचे गणित बिघडवण्याचा प्रयत्न करणार. आज, सोमवारी मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. यात हैदराबादला रोखण्याचा प्रयत्न मुंबई करणार आहे.

खेळपट्टीचा अंदाज : वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असते, पण गेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात खेळपट्टीचा नूर वेगळाच दिसला. फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व बघायला मिळाले. कोलकात्याच्या सुनील नरायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपून कोलकात्याला विजय मिळवून दिला. आजच्या लढतीत वानखेडेवरील ही खेळपट्टी वापरली जाते का ते बघायचे.

मुंबई आणि हैदराबाद यांच्या सामन्यातील महत्वाची आकडेवारी

आमने-सामने : २३ सामने, मुंबईचे विजय १२, हैदराबादचे विजय १०, एक लढत अनिकाली.

प्रक्षेपण : संध्याकाळी ७.३० पासून स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई.

हार्दिकच्या नेतृत्वावर होते जोरदार टीका

'हार्दिकला काहीही जमत नाही. त्याचा सूर गवसण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्याच्यावर खूपच दडपण आहे. त्याला अनेकांचा विरोध आहे. त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो. फलंदाजांनाही काय करावे, हे उमजत नाही,' असे स्मिथ यांनी सांगितले. 'खरे तर या मोसमात मुंबईने सातत्याने तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, टिम डेव्हिड ही फलंदाजीतील तीन ते सहा अशी क्रमवारी ठेवायला हवी होती; पण त्यात सतत बदल होत आहेत. नेमके काय करावे, याबाबत संघाचा गोंधळ उडालेला आहे,' असे ग्रमी स्मिथने सांगितले.

पंड्याच्या नेतृत्वावर शेन वॉटसन यांनीही टीका केली. 'कोलकात्याचा डाव ५ बाद ५७ असा घसरला होता, त्या वेळी नमन धीरकडे गोलंदाजी देणे चुकीचे होते. हे निर्णय हार्दिक घेत होता की मैदानाबाहेरून सूचना दिल्या जात होत्या. तोपर्यंत जसप्रीत बुमराहने एकच षटक टाकले होते. वेंकटेश अय्यर आणि मनीष पांडे ही जोडी जमण्यापूर्वीच ती तोडण्याची जबाबदारी बुमराहकडे सोपवणे योग्य ठरले असते,' असे वॉटसन यांनी सांगितले. बुमराहला गोलंदाजी दिली त्या वेळी उशीर झाला होता. ही जोडी जमल्याबद्दल स्वतःला राग कसा त्या वेळी येतो. मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाने यासारखे अनेक चुकीचे निर्णय घेतले, असेही त्याने सांगितले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T14:07:02Z dg43tfdfdgfd