मुंबई प्ले ऑफमध्ये पोहोचणार का, हार्दिक पंड्याने सामन्यानंतर दिले भन्नाट उत्तर

मुंबई : वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सने सनराझर्स हैदराबादला पराभूत केले. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफमधील आव्हान अजूनही कायम असल्याचे म्हटले जात होते. मुंबई काही समीकरणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचणार का, या प्रश्नावर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने सामना संपल्यावर भन्नाट उत्तर दिले.

मुंबई इंडियन्सचा हा १२ वा सामना होता. या १२ व्या सामन्यात मुंबईच्या संघाने चौथा विजय साकारला. त्यामुळे मुंबईच्या संघाचे आता आठ गुण झाले आहेत आणि त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे बाकीचे दोन सामने जिंकले तर मुंबईच्या संघाचे १२ गुण होऊ शकतात. मुंबईचा संघ हा १२ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो, असे म्हटले जात आहे. या प्रश्नावर आता हार्दिक पंड्याने उत्तर दिले आहे.

सामान संपल्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी हार्दिकला विचारले की, " तुम्ही हा सामना जिंकलात. या विजयानंतर मुंबईचा संघ हा प्ले ऑफमध्ये अजूनही पोहोचू शकतो, अशी गणितं मांडली जात आहेत. या प्ले ऑफच्या गणिताबद्दल तुला नेमकं काय वाटतं, तुम्ही त्याच्या विचार करत आहात की नाही."

मांजरेकर यांच्या प्रश्नावर हार्दिक म्हणाला की, " मला माहित नाही की आम्हाला कोणत्या गणितीय परिस्थितीतून जावे लागेल, पण आज आम्ही ज्यापद्धतीने खेळलो त्याबद्दल नक्कीच आनंदी आहे. आम्ही या सामन्यात गोलंदाजी करताना १५-२० धावा जास्त दिल्या असे मला वाटते. पण आमची फलंदाजी ही जबरदस्त होती. माझ्या गोलंदाजीबद्दल म्हणाल तर मला जे गोलंदाजीत करायचे होते, ते मी केले. मी अचूक टप्प्यांवर चेंडू टाकले आणि त्यामुळेच माझी गोलंदाजी चांगली होऊ शकली. मी जे ठरवले होते ते आज घडले. पण माझ्यामते पीयुष चावलाने चांगली गोलंदाजी केली. त्याने हैदराबादच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे आम्ही विजयाचे स्वप्न पाहू शकलो. सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज हा माझ्या संघात आहे, हे मी माझे भाग्य समजतो. कारण सूर्या गोलंदाजांवर एवढे दडपण आणतो की, गोलंदाज त्याच्यापुढे हतबल होताना पाहिले आहे. पण सूर्याकडून अजून अशाच खेळीची अपेक्षा आम्हाला नक्कीच यापुढेही असेल."

मुंबई इंडियन्सचा हा आयपीएलमधला चौथा विजय होता. अजून मुंबईच्या संघाचे दोन सामने बाकी आहेत. या दोन्ही सामन्यांत जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांचे १२ गुण होऊ शकतात. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना अजूनही त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचेल, अशी आशा आहे. पण याबाबत हार्दिक पंड्याने थेट बोलणे मात्र टाळले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T18:37:45Z dg43tfdfdgfd