'मुंबईचा योद्धा' कोण आहे हे रोहित शर्माने स्वत:च सांगितलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाला...

मुंबई: रणजी ट्रॉफी २०२४च्या फायनल मॅचमध्ये मुंबईने विदर्भचा १६९ धावांनी पराभव करून विक्रमी ४२वे विजेतेपद मिळवले. मॅचच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विदर्भाच्या अखेरच्या फलंदाजाला धवल कुलकर्णीने बाद केले आणि संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. धवलने या सामन्यात दोन्ही डावात मिळून चार विकेट घेतल्या. या मॅचसह त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ही त्याची अखेरची प्रथम श्रेणीतील मॅच ठरली. सामना झाल्यानंतर त्याच्या निरोपासाठी पत्नी आणि मुलगी उपस्थित होती.

धवल कुलकर्णीच्या निवृत्तीनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात रोहितने धवलचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत रोहितने धवलचा उल्लेख मुंबईचा योद्धा असा केला आहे. तसेच रोहितने Well Done on a Fantastic Career असे म्हणत धवलला टॅग केले आहे.

रणजी ट्रॉफीची फायनल ही धवलची प्रथम श्रेणीतील ९५वी मॅच होती. धवलने मुंबईकडून ९५ प्रथम श्रेणी, १३० लिस्ट ए सामने खेळले. त्याने प्रथम श्रेणीत २८१ विकेट घेतल्या तर लिस्ट एमध्ये त्याच्या नावावर २२३ विकेट आहेत. टी-२० मध्ये देखील धवलने शानदार कामगिरी केली आहे. १६२ सामन्यात त्याच्या नावावर १५४ विकेट आहेत.

भारताच्या राष्ट्रीय संघाकडून धवलने १२ वनडे आणि २ टी-२० मॅच खेळल्या आहेत. वनडेत त्याने १९ तर टी-२०मध्ये ३ विकेट घेतल्या.

2024-03-14T12:30:15Z dg43tfdfdgfd