मुंबईचे कर्णधारपद गमावल्यावर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला माझ्यासाठी ही गोष्ट मोठी...

मुंबई : रोहित शर्मा हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी कर्णधार होता. मुंबई इंडियन्सला त्याने चार जेतेपदं जिंकवून दिली होती. पण तरीही मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदावरून काढले आणि हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवले. याबाबत रोहित शर्मा आतापर्यंत काहीच बोलला नव्हता. पण आता कर्णधारपद गेल्याबाबत रोहितने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएलचा लिलाव होण्यापूर्वी सर्वांनाच मोठा धक्का दिला. कारण त्यांनी खेळाडूंची अदला-बदल करताना हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेतले आणि काही दिवसांतच त्याला कर्णधार बनवले. त्यामुळे चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर आयपीएल सुरु झाले. आयपीएल सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत चाहते हार्दिक पंड्याला ट्रोल करत आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झालेली नाही. हे सर्व एकाबाजूला सुरु असताना रोहित शर्माने एकही शब्द कर्णधारपदाबद्दल काढला नव्हता. पण आता रोहित शर्माने आपले मौन सोडले आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, " हे बघा आयुष्यात अशा काही गोष्ट घडत असतात. आयुष्याचा हा एक भागच आहे. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनानुसार घडत नसते. पण यापूर्वीही मी अन्य कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट फारशी मोठी नाही. जशी परिस्थिती आहे, त्यानुसार तुम्हाला वागावे लागते. त्यानंतर एक खेळाडू म्हणून तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांची पूर्ती करण्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला हवी, असे मला वाटते. मी गेल्या एका वर्षापासून हीच गोष्ट करत आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाही, यापूर्वीही मी ही गोष्ट केली आहे. फक्त मधला काही काळ माझ्याकडे अतिरीक्त जबाबदारी होती, ती पार पाडण्याचा मी प्रयत्न नक्कीच केला. पण आता एक खेळाडू म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा कशा पूर्ण होतील, याकडे माझे लक्ष असेल."

रोहित शर्मा आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये १० सामने खेळला आहे. या १० सामन्यांमध्ये रोहित शर्माने ३१४ धावा केल्या आहेत. या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे चार सामने अजून बाकी आहेत. या चार सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार की नाही, हे समजू शकते. पण मुंबई इंडियन्स अजून चार सामने खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे या चार सामन्यांमध्ये रोहित शर्मा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

आयपीएल संपल्यावर रोहित शर्मा टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहितकडे कर्णधारपद असणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T11:25:11Z dg43tfdfdgfd