मुंबईने दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकत संघात केला एकमेव मोठा बदल, हार्दिकने कोणाला संधी दिली पाहा

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिकने मुंबईचा या सामन्यासाठी ११ खेळाडूंचा सघ जाहीर केला. यावेळी मुंबईच्या संघाने आपल्या संघात एकमोव मोठा बदल केला आहे.

मुंबईच्या संघातून यावेळी ल्यूक वुडला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी क्वेना मफाकाला संधी देण्यात आली आहे. नव्या आयपीएल टी-२० क्रिकेट मोसमातील पहिल्या विजयासाठी आज, बुधवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होईल. हैदराबादला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा लाभेल; पण लीगमधील कामगिरी बघितल्यास मुंबईच्या विजयाची शक्यता जास्त आहे.

हेन्रीच क्लासेनला रोखण्याचे मुंबईसमोर आव्हान असेल, त्याचबरोबर टी. नटराजनचा भेदक मारा मुंबईची डोकेदुखी ठरू शकतो. दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी जमेची बाजू म्हणजे रोहितला गवसलेला सूर; तसेच जसप्रीत बुमराहचा प्रभावी मारा. या दोघांनीही पहिल्या सामन्यात कमाल केली होती. पण बाकीचे खेळाडू अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात सूर्यकुमार यादवची अनुपस्थिती मुंबईला पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराह, पीयूष चावलासारखे अनुभवी गोलंदाज मुंबई संघात आहेत, तर टी. नटराजन, भुवी, कमिन्स हे हैदराबादच्या गोलंदाजीची ताकद खूपच वाढवतात. त्यामुळे दोन्ही संघांची गोलंदाजी भेदक आहे. हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा हे अनुभवी आजी-माजी कर्णधार मुंबईकडे आहेत; पण वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी विजेता पॅट कमिन्स हैदराबादकडे आहे हे विसरता येणार नाही.

दोन्ही संघांमधील २१ पैकी १२ सामन्यांत मुंबईचा विजय झाला आहे. दोघांमधील गेल्या पाचपैकी चार लढतींत मुंबईचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. गतमोसमात मुंबईने हैदराबादविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्या होत्या. स्पर्धेत एकूण मुंबईचे गेल्या पाचपैकी तीन सामन्यांत पराभव, तर हैदराबादची पाचही सामन्यांत हार झालेली आहे.

हैदराबाद वि. मुंबई

ठिकाण ः राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

वेळ ः संध्याकाळी ७.३० पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा

यंदाच्या स्पर्धेत ः सलामीच्या सामन्यात दोन्ही संघांची हार. हैदराबाद चार, तर मुंबई सहा धावांनी पराभूत

नाणेफेकीनंतर ः या मैदानावरील यापूर्वीच्या दोन आयपीएल सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय. त्यामुळे प्रतिस्पर्धी प्रथम गोलंदाजीस पसंती देण्याची शक्यता

खेळपट्टीचा अंदाज ः मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या सरासरी धावा १६०; पण किमान १८० धावांचे लक्ष्य असणार

हवामानाचा अंदाज ः स्वच्छ हवामान; तसेच सामन्याच्या वेळी तापमान २९ अंशाच्या आसपास असणार हे चांगल्या खेळासाठी पोषक

2024-03-27T13:46:52Z dg43tfdfdgfd