राखीव खेळाडू ते कॅप्टन, ऋतुराज गायकवाडबद्दल माहिती नसलेल्या खास गोष्टी जाणून घ्या..

गोपाळ गुरव : चेन्नई सुपर किंग्ज संघाला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने गुरुवारी कर्णधारपद सोडले. त्याने आपला ‘मुकुट’ युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे सोपविला. पण मराठमोळ्या २७ वर्षीय ऋतुराज गायकवाडबद्दल काही खास गोष्टी अजून बऱ्याच जणांना माहिती नाहीत. मटाच्या वाचकांसाठी ऋतुराज गायकवाडच्या या खास गोष्टी, जाणून घ्या...

पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे सुरुवातीला गायकवाड कुटुंब राहत होते, त्यानंतर ते पिंपरीतील सांगवी येथे आले. ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड हे संरक्षण संशोधन विकास संस्थेचे (DRDO) कर्मचारी होते. त्याची आई सविता गायकवाड या महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. ऋतुराज गायकवाडची वयाच्या चौथ्या वर्षापासूनच बॅट-बॉलशी गट्टी जमली. त्याने क्रिकेटचे प्राथमिक धडे थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत गिरवले.

ऋतुराजला कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने गेल्या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदक जिंकले होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतही त्याने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे. वयाच्या १९व्या वर्षी ऋतुराज महाराष्ट्र संघात दाखल झाला होता. ऋतुराज भारताकडून सहा वन-डे आणि १९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळला आहे. त्याने कारकिर्दीत १२२ ‘टी-२०’ सामन्यांत १३८.८९च्या सरासरीने ४०३५ धावा केल्या आहेत. ऋतुराज २०१९मध्ये चेन्नई संघात आला होता. त्या वेळी तो केवळ राखीवमध्ये होता.

ऋतुराजला २०२०मध्ये मोसमातील अखेरच्या सहा सामन्यांत संधी मिळाली. या संधीचे सोने करून त्याने तीन अर्धशतके ठोकली होती. यानंतर तो चेन्नईचा महत्त्वाचा सलामीवीर झाला. २०२१मध्ये त्याने १६ सामन्यांत ६३५ धावा केल्या, तर २०२२मध्ये १४ सामन्यांत ३६८. चेन्नईने गतवर्षी विजेतेपद मिळवले. त्यात ऋतुराजचाही मोलाचा वाटा होता. त्याने १६ सामन्यांत १४७.५०च्या स्ट्राइक रेटने ५९० धावा केल्या. आयपीएलमध्ये एकूण ५२ सामन्यांत त्याने १३५.५२च्या स्ट्राइक रेटने १७९७ धावा केल्या असून, यात एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

ऋतुराजला खरी ओळख धोनीमुळेच मिळाली. देशांतर्गत क्रिकेट सामन्यात झारखंडविरुद्ध खेळताना ऋतुराजला चेंडू लागला होता. त्या वेळी धोनीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. ऋतुराजने २०२२मध्ये विजय हजारे करंडक स्पर्धेत एका षटकात ४३ धावा फटकारल्या होत्या. उत्तर प्रदेशविरुद्ध अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याने शिवा सिंगविरुद्ध एका षटकात सात षटकार (६-६-६ (नोबॉल) ६-६-६-६) ठोकले होते. ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार आहे. उत्कर्षा पवारही क्रिकेटपटू आहे. ती महाराष्ट्राची अष्टपैलू खेळाडू आहे.

चेन्नईच्या कर्णधारपदी आता ऋतुराज विराजमान झाला आहे. त्यामुळे आता तो चेन्नईच्या संघाचे कसे नेतृत्व करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-22T10:04:58Z dg43tfdfdgfd