रोहित आणि हार्दिकच्या वादात आता नवज्योत सिद्धूची उडी, म्हणाले देवाला तुम्ही विहरीच्या...

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे पुन्हा एकदा कॉमेंट्रीच्या मैदानात परतले आहेत. पण समालोचनाकडे वळताना त्यांनी हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्स यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कारण आता त्यांनी हार्दिक आणि रोहित यांच्या वादात उडी घेतली आहे.

सिद्धूने यावेळी म्हटले की, " मुंबई इंडियन्स कधीही असा निर्णय घेईल, असे मला वाटले नव्हते. कारण रोहित शर्मा एक कर्णधार म्हणून सर्व गोष्टी यथोचित पार पाडत होता. आता विजय आणि पराभव या खेळाच्या दोन बाजू आहेत. पण रोहितला काढून मुंबई इंडियन्सचा संघ हार्दिक पंड्याला कर्णधार करेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण ही गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळत आहे."

सिद्धू यांनी शायरीच्या अंदाजात रोहित आणि हार्दिक यांची तुलनाही करून दाखवली आहे. सिद्धू म्हणाला की, " ठेंगणा माणूस जो आहे, तो शिखरावर जरी पोहोचला तरी त्याची उंची वाढत नाही, तो ठेंगणाचा ठेंगणाच राहतो. पण देव जरी विहरीच्या तळाशी असेल तरी तो देवच असतो. त्यामुळे या दोन्हीची तुलना करता येऊ शकत नाही. सोन्याला तप्त आगीमधून जावे लागते, त्यानंतर त्याला घावही सहन करावे लागतात. पण तरीही सोने सोनेच असते आणि ते पायात नाही परिधान केले जात, त्याची जागा ही गळ्यातच असते. मला तर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित असताना हार्दिकला देण्यात येईल, यावर विश्वास बसत नाही." सिद्धूने रोहितची तुलना यावेळी देवाशी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सिद्धू यांच्यावर रोहितचे चाहते खूष असतील.

हार्दिक पंड्याकडे असलेले मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हा सध्याच्या घडीच्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतल्यावर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांना ट्रोल केले होते. अजूनही हार्दिकला चाहते ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात या गोष्टीचा अनुभव सर्वांनाच आला होता.

2024-03-27T10:31:34Z dg43tfdfdgfd