रणजी फायनलमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेची भन्नाट खेळी; मुंबई विक्रमी जेतेपदापासून एक पाऊल दूर

मुंबई : मोक्याच्या क्षणी कशी कामगिरी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ हा मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने दाखवून दिला. दुसऱ्या डावात मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. पण अजिंक्यने यावेळी मुंबईच्या संघाला सावरले. अजिंक्यच्या या खेळीमुळे मुंबईचा संघ हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयाच्या मार्गावर परतला आहे. अजिंक्यच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २ बाद १४१ अशी मजल मारली आहे. त्यामुळे आता मुंबईकडे एकूण २६० धावांची आघाडी असल्याचे समोर आले आहे.

मुंबईने विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत गुंडाळला. पण त्यानंतर मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. मुंबईला पृथ्वी शॉच्या रुपात पहिला धक्का बसला . पृथ्वीकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. विदर्भाचा युवा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने पृथ्वीला ११ धावांवर असताना क्लीन बोल्ड केले. त्यानंतर मुंबईला दुसरा धक्का बसला तो भुपेन लालवानीच्या रुपात. विदर्भाच्या हर्ष दुबेने भुपेनला झेलबाद केले, त्याला १८ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईची २ बाद ३४ अशी अवस्था झाली होती. यावेळी जर मुंबईला अजून एक धक्का बसला असता तर ते बॅकफूटवर गेले असते. पण यावेळी अजिंक्य रहाणे मुंबईच्या मदतीला धावून आला.

अजिंक्यने यावेळी मुशीर खानला साथीला घेतले आणि संघाच्या धावसंख्येची दमदार उभारणी केली. अजिंक्यने यावेळी मुशीच्या मदतीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईच्या संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करता आली. मुंबईला पहिल्या डावात चांगली आघाडी मिळवता आली होती. पण ती विजयासाठी पुरेशी नव्हती. पण आता अजिंक्यच्या या खेळीमुळे आता मुंबईला मोठी आघाडी मिळवता आली आहे.

अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान यांनी मोठी धावसंख्या उभारत मुंबईच्या विजयाचा पाया रचल्याचे समोर आले आहे. कारण अजिंक्यने यावेळी चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी साकारली. अजिंक्यला साथ देणाऱ्या मुशीरने यावेळी ३ चौकारांच्या जोरावर नाबाद ५१ धावा केल्या आहेत.

मुंबईने पहिल्या डावात तर आघाडी घेतली आहेच, पण आता त्यांनी विजयाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली आहे. कारण खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मुंबईचा संघ अजून १००-१५० धावा करून आपला दुसरा डाव जाहीर करू शकते, असे म्हटले जात आहे.

2024-03-11T12:07:08Z dg43tfdfdgfd