विजय मल्ल्याच्या ट्विटनंतर विराट कोहलीचे टेंशन वाढले, RCB च्या विजयानंतर काय म्हणाला पाहा...

नवी दिल्ली : आरसीबीच्या संघाने WPL चे जेतेपद पटकावले. या आरसीबीच्या विजेतापदानंतर विजय मल्ल्याचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. पण मल्ल्याच्या ट्विटने आता विराट कोहलीचे टेंशन वाढलेले आहे.

महिलांच्या लीगची फायनल चांगलीच रंगली. आरसीबीच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर विजय साकारला आणि जेतेपद पटकावले. या आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीने संघासाठी एक व्हिडिओ कॉल केला होता आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन केले होते. विराट कोहलीच्या या व्हिडिओ कॉलची जोरदार चर्चा रंगली होती. विराट कोहलीच्या कॉलनंतर आता विजय मल्ल्याचे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. विजय मल्ल्याने आरसीबीच्या संघाचे अभिनंदन तर केलेच आहे, पण त्याचबरोबर आता विराट कोहलीचे टेंशन वाढवले आहे.

विजय मल्ल्याने ट्विटमध्ये असं नेमकं काय लिहिलं आहे, जाणून घ्या...

विजय मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, " आरसीबीच्या महिला संघाचे मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी WPL चे जेतेपद पटकावले आहे. पण हा आनंद द्विगुणीत तेव्हाच होईल जेव्हा आरसीबीचा पुरुषांचा संघ आयपीएलचे जेतेपद जिंकेल, जे बऱ्याच वर्षांपासून त्यांना जमलेले नाही. गुड लक." एकिकडे मल्ल्याने आरसीबीच्या महिला संघाचे अभिनंदन तर केलेच आहे, पण त्याच्या या ट्विटची दुसरी ओळ बरंच काही सांगून जाणारी आहे. मल्याने यावेळी पुरुषांच्या संघाला जेतेपद पटकावण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पण बऱ्याच वर्षांपासून त्यांना आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही, अशी खंतही व्यक्त केली आहे. काही लोकांना हा टोमणाही वाटू शकतो. कारण आतापर्यंत एकदाही आरसीबीच्या पुरुष संघाला आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही.

विराट कोहलीचे टेंशन का वाढू शकते, जाणून घ्या...

विराट कोहली हा बऱ्याच वर्षांपासून आरसीबीच्या संघात आहे. कोहलीने आरसीबीच्या संघाचे नेतृत्वही केले होते. पण त्याला आरसीबीच्या संघाला अजूनही जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. आरसीबीचा संघ सर्वाधिक पैसे हे नक्कीच कोहलीसाठी मोजतो, पण अजूनपर्यंत कोहलीने त्यांना निराशच केले आहे. त्यामुळे मल्ल्याच्या ट्विटमुळे कोहलीचे टेंशन वाढले असेल आणि जेतेपद पटकावण्याची टांगती तलवार आता त्याच्या डोक्यावर असेल.

आरसीबीने आतापर्यंत दिग्गज खेळाडू आपल्या संघात घेतले. पण कोहली हा पूर्वीपासून संघाचा एक अविभाज्य भाग आहे. कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक धावाही केल्या आहेत, पण त्याला संघाला एकदाही जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. त्यामुळे या वर्षी तरी आरसीबीचा संघ आयपीएलचे जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

2024-03-18T07:40:04Z dg43tfdfdgfd