विराट कोहलीच्या चुकीचा आरसीबीला बसला मोठा फटका, पाहा नेमकं घडलं तरी काय...

बेंगळुरु : आरसीबीचा सामना म्हटला की सर्वांचं लक्ष लागलेले असते ते विराट कोहलीवर. पण हैदराबादच्या सामन्यात विराट कोहलीकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचा फटका आरसीबीच्या संघाला बसला.

हैदराबादच्या संघाने विक्रमी २८७ धावा केल्या होत्या. ही धावसंख्या गाठणे सोपे नक्कीच नव्हते. पण चाहत्यांचा आरसीबीच्या संघावर विश्वास होता. कारण विराट कोहली आणि फॅफ ड्यु प्लेसिससारखे सलामीवीर त्यांच्याकडे होते. विराट आणि फॅफ यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली होती. त्यामुळे आरसीबीच्या संघाला विजयाची आशा दिसत होती. पण त्याचवेळी कोहलीकडून एक चूक घडली आणि त्याचा फटका आरसीबीच्या संघाला बसला.

ही गोष्ट घडली ती सातव्या षटकात. त्यापूर्वी आरसीबीने सहा षटकांतच ७० धावांचा पल्ला गाठला होता. पण हैदराबादने हे षटक युवा फिरकी गोलंदाज मयांक मार्कंडेयला देण्याचे ठरवले. कोहली फिरकी गोलंदाजीला चांगलाच खेळतो, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली हा मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण यावेळी मयांरकने गुगली टाकली होती. ही गुगली कोहलीला ओळखता आली नाही. त्यामुळे कोहली स्वीपचा फटका मारण्यासाठी गेला खरा, पण चेंडू त्याच्या बॅटच्या दिशेने आलाच नाही हा चेंडू थेट स्टम्पला जाऊन लागला आणि कोहली क्लीन बोल्ड झाल्याचे समोर आले. कोहलीने २० चेडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४२ धावांची दमदार खेळी साकारली होती. त्यामुळे कोहली यावेळी मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण कोहली बाद झाला आणि त्याचा आरसीबीच्या संघाला मोठा फटका बसला. कारण कोहली बाद झाल्यावर संघाची पडझड सुरु झाल्याचे पाहायला मिळाले आणि हाच आरसीबीच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.

विराट कोहलीच्या या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा झाल्या आहेत, त्यामुळे ऑरेंज कॅप त्याच्याकडेच आहे. पण या सामन्यात कोहली बाद झाला आणि तिथेच आरसीबीच्या चाहत्यांनी विजयाची आशा सोडल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-15T18:06:31Z dg43tfdfdgfd