विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, आतापर्यंत कोणालाच जमला नाही हा रेकॉर्ड

चेन्नई : विराट कोहलीने आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने केलेला हा विक्रम आतापर्यंत कोणालाही जमलेला नाही.

विराट कोहली हा बराच काळ क्रिकेटपासून लांब होता. भारताच्या संघात तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही नव्हता. कोहली पत्नी अनुष्का शर्माबरोबर होता आणि त्यांच्या घरी पाळणा हलला. त्यामुळे कोहली जवळपास एक महिना क्रिकेटपासून लांब होता. पण आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात उतरल्यावर कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पहिल्या सामन्यात कोहली जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याला जास्त चेंडू खेळायला मिळत नव्हते. कारण त्यावेळी आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस हा चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता. त्यामुळे जेव्हा आरसीबी चार षटके सामना खेळला होता, तेव्हा कोहलीच्या वाट्याला फक्त चार चेंडूंच आले होते. या चार चेंडूंमध्ये त्याने तीन धावा केल्या होत्या.

कोहलीने या सामन्यात संयतपणे सुरुवात केली खरी, पण त्याने या सामन्यात इतिहास रचला. हा सामना सुरु होण्यापूर्वी कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये ११, ९९४ धावा केल्या होत्या. त्यामुळे कोहलीने सहा धावा करताच त्याच्या टी-२० क्रिकेटमधील १२ हजार धावा पूर्ण होणार होत्या. कोहलीने या सामन्यात सहा धावा केल्या आणि भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये १२, ००० धावा करणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोहलीने यावेळी सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि १२ हजार धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही खेळाडूला टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा पल्ला गाठता आलेला नव्हता. पण कोहलीने आपल्या आयपीएलच्या या हंगामातील पहिल्याच सामन्यात टी-२० क्रिकेटमधील १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आरसीबीसाठी या सामन्यात कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिसने धडाकेबाज सुरुवात करून दिली. फॅफने यावेळी २३ चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर ३५ धावांची धमाकेदार फटकेबाजी केली. फॅफ बाद झाला आणि त्यानंतर आरसीबीला त्याच षटकात दुसरा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. कारण मिस्ताफिझूर रेहमानने आपल्या पहिल्या षटकात फॅफनंतर रजत पाटीदारलाही बाद केले. रजतला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

आरसीबीने दोन फलंदाज झटपट गमावले आणि त्यामुळे संघाची सर्व जबाबदारी यावेळी विराट कोहलीवर आली होती. त्यामुळे कोहली या सामन्यात किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोहलीने या सामन्यात सहा धावा केल्या आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर यावेळी केला.

2024-03-22T15:20:31Z dg43tfdfdgfd