विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल आगरकर यांनी अखेर मौन सोडले, म्हणाले आम्ही त्याचा विचार...

मुंबई : विराट कोहलीचा स्ट्राइक रेट हा सध्याच्या घडीला चिंतेचा विषय ठरला आहे. कारण कोहली मोठी खेळी साकारतो, पण जास्त चेंडू त्यासाठी वापरतो. त्यामुळे कोहलीवर आयपीएल सुरु असताना जोरदार टीका केली जात आहे. पण तरीही त्याला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर कोहलीच्या या स्ट्राइक रेटबद्दल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी अखेर मौन सोडले आहे.

विराट कोहलीने आयापर्यंतच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आरसीबीकडून तो एकटाच दमदार फलंदाजी करताना दिसतो. विराटने या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतकंही झळकावली आहेत. पण आयपीएलमध्ये जिथे खेळाडू ४०-४५ चेंडूंमध्ये शतक झळकावताना दिसली तिथे कोहली शतकासाठी ६० चेंंडूं घेताना दिसला, त्यामुळेच त्याच्यावर टीका केली जात आहे.

कोहलीबाबत अगरकर म्हणाले की, " विराट कोहली हा एक अनुभवी क्रिकेटपटू आहे. सध्याचा आयपीएलमध्ये तो भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याच्या स्ट्राइक रेटबाबत मात्र आम्ही चर्चा केली नाही. कोहलीच्या निवडीबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही." कोहलीकडे अनुभव एवढा जास्त आहे की, त्याच्या स्ट्राइक रेटची चर्चा त्याला टी-२० संघात स्थान देताना झाली नसल्याचे आता आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोहलीचा स्ट्राइक रेट हा काही मोठा मुद्दा नसल्याचे निवड समितीला वाटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोहली धावा करत असला तरी त्याच्यापेक्षा अन्य खेळाडू हे जलदगतीने धावा करताना दिसतात. जिथे कोहलीला एका सामन्यात ६० धावा करण्यासाठी ४० चेंडू लागले होते, तिथे रजत पाटीदारने २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.त्यामुळे कोहलीवर टीका होताना दिसत आहे. आता तर कोहलीकडे ऑरेंज कॅपही राहिेलेली नाही. कारण ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप कोहलीकडून हिसकावत आपल्या नावावर केली आहे.

विराट हा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याचा फायदा भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कपमध्ये होईल, असे भारताच्या निवड समितीला वाटत आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-02T12:51:25Z dg43tfdfdgfd