विराटला टी-२० वर्ल्ड कप खेळवायचा की नाही, रोहितने बीसीसीआयला स्पष्ट निर्णयच सांगितला

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपसाठी आता भारताच्या निवड समितीने चाचपणी सुरु केली आहे. विराट कोहली गेले काही दिवस भारताकडून खेळलेला नाही. त्यामुळे त्याला टी-२० वर्ल्ड कपमध्ये संधी द्यायची की नाही, हे बीसीसीआयने रोहित शर्माला विचारले होते. यावर रोहित शर्माने आपले मत बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितले आहे.

बीसीसीआयने रोहित शर्माने विराटबाबत विचारले...

बीसीसीआयने टी-२० वर्ल्ड कपसाठी आता संघ बांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते रोहित शर्माच्या संपर्कात आहेत. टी-२० वर्ल्ड कपच्या संघात कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची, यासाठी बीसीसीआय चाचपणी करत आहे आणि त्याबाबत रोहित शर्माला त्याचे मत विचारत आहे. बीसीसीआयने विराट कोहलीबाबतही रोहित शर्मासा विचारले असल्याचे आता समोर आले आहे.

रोहित शर्मा विराट कोहलीबाबत बीसीसीआयला काय म्हणाला, जाणून घ्या...

विराट कोहलीला टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळवायचे काही नाही, हे बीसीसीआयने रोहितला विचारले होते. रोहित आणि विराट यांच्यामधून विस्तवही जात नसल्याचे म्हटले जाते. कारण या दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून वाद असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रोहित यावेळी कोहलीबाबत बीसीसीआयला काय सांगणार, याची उत्सुकता सर्वांना होती. रोहितने अखेर कोहलीबाबतचा निर्णय बीसीसीआयला कळवला असल्याचे भारताचे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी सांगितले आहे. आझाद म्हणाले की, " बीसीसीआयने रोहित शर्माला विराट कोहलीला टी-२० वर्ल्ड कपच्या संघात स्थान द्यायचे की नाही, असे विचारले होते. त्यावर रोहित शर्मा म्हणाला आहे की, विराट कोहली हा भारतीय संघासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळायला हवे, असे मला वाटते."

विराटला वेगळा आणि ईशानला वेगळा न्याय...

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने नवीन नियम बनवले आहेत आणि त्याची ठोस अंमलबजावणीही ते करत आहेत. त्यामुळेच बीसीसीआयने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही आपल्या करारात स्थान दिलेले नाही. त्यामुळे आता विराट कोहली संघात कसा येणार, यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जर ईशान आणि श्रेयस यांचाच न्याय विराटला लावला तर तो भारताच्या टी-२० वर्ल्ड कपच्या संघात बसत नाही. कारण कोहलीने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळलेली नाही. त्यामुळे त्याला टी-२० वर्ल्ड कपच्या संघात संधी मिळणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

रोहित शर्माने एक कर्णधार म्हणून संघाच्या हितासाठी वैयक्तिक सर्व गोष्टी बाजूला ठेवत हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. कारण रोहितच्या निर्णयानुसारच टी-२० वर्ल्ड कपचा संघ निवडला जाणार आहे.

2024-03-18T11:40:25Z dg43tfdfdgfd