श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट, रणजीतून बाहेर पण आयपीएल खेळणार की नाही जाणून घ्या...

गौरव गुप्ता : श्रेयस अय्यरने काही दिवसांपूर्वी आपण दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले होते. पण त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे श्रेयसला रणजी स्पर्धेच्या अंतिम सामना खेळावा लागला. रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो तीन दिवस मैदानात होता. पण चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याची पाठ दुखायला लागली आणि त्याने मैदानाबाहेर राहणे पसंत केले. त्यामुळे आता श्रेयस आयपीएल खेळणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. पण याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

'रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढत पाठदुखीमुळे खेळू शकलो नाही,' असे श्रेयस अय्यरने सांगितले होते. त्या वेळी त्याने जाणूनबुजून लढत टाळल्याचा आरोप केला जात होता. आता त्याची ही पाठदुखी पुन्हा बळावली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईच्या श्रेयसने विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बुधवारी दिवसभर क्षेत्ररक्षण केले नाही. गतवर्षीच्या आयपीएलपूर्वीही श्रेयसला पाठदुखीने सतावले होते. त्यामुळे तो आयपीएल खेळू शकला नव्हता. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरच तो वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. आता पुन्हा त्याचा आयपीएल सहभाग संकटात आहे. श्रेयस करारबद्ध असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सची पहिली लढत २३ मार्चला आहे.

श्रेयसने मंगळवारी सामना सुरू असताना पाठदुखीवर दोनदा उपचार करून घेतले होते. या २९ वर्षीय फलंदाजाचे हे दुखणे पुन्हा बळावले आहे. 'श्रेयसला गतवर्षीही पाठदुखीने सतावले होते. तेच दुखणे पुन्हा बळावले आहे. तो पाचव्या दिवशीही क्षेत्ररक्षण करू शकणार नाही. तो आयपीएलमधील सुरुवातीचे सामने न खेळण्याचीच शक्यता आहे,' असे सूत्रांनी सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या वेळी श्रेयसने आपल्या पाठदुखीबाबत सांगितले होते. त्याची तिसऱ्या कसोटीपासून संघात निवड झाली नव्हती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय समितीचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयस तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतरही दोन रणजी लढती खेळला नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने करारबद्ध खेळाडूत स्थान नाकारले होते.

2024-03-14T07:44:34Z dg43tfdfdgfd