हार्दिक पंड्याचा मुंबई इंडियन्स संघ नाही, वीरेंद्र सेहवाग असं का म्हणाला जाणून घ्या खरं कारण...

मुंबई : हार्दिक पंड्याला सध्या जोरदार ट्रोल केले जात आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामध्येच आता भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एक मोठं वक्तव्य केलं आहे. ही हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स नाही, असे वक्तव्य आता सेहवागने केले आहे.

या आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलला. रोहित शर्माला त्यांनी कर्णधारपदावरून दूर केले आणि हार्दिकच्या हाती नेतृत्व सोपवले. पण त्यानंतर हार्दिक पंड्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये चाहत्यांनी हार्दिक पंड्याची हुर्यो उडवली आहे. त्याचबरोबर हार्दिकचे नेतृत्वही अपयशी ठरलेले पाहायला मिळाले आहे. कारण आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला आहे. आतापर्यंत तिन्ही सामने गमावणारी मुंबई इंडियन्स हा या आयपीएलमधील एकमेव संघ ठरला आहे. त्यानंतर आता सेहवागने एक मोठे वक्तव्य केले आहे.

सेहवाग म्हणाला की, " आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये आपण पाहिले तर मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या ३ - ४ लढती हरत होता आणि त्यानंतर दमदार कमबॅक करत होता. पण ती रोहित शर्माची मुंबई इंडियन्स होती, हार्दिक पंड्याचा मुंबई इंडियन्स संघ नाही. पण आता हार्दिक मुंबईचा कर्णधार आहे. त्यामुळे आता तीन सामन्यांच्या पराभवानंतर कसे कमबॅक करायचे, हे दडपण यावेळी हार्दिक पंड्यावर सर्वात जास्त असेल." आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलमध्ये बऱ्याच वेळा तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामने गमावले आहेत. पण जेव्हा मुंबईने एवढे सामने गमावले होते, तेव्हा संघाने दमदार पुनरागमनही केले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली असे बऱ्याच वेळा पाहायला मिळाले आहे की, मुंबई इंडियन्सने पहिले ३-४ सामने गमावले आहेत, पण त्यानंतर मुंबईच्या संघाने कमबॅकही केले होते. पण तेव्हा रोहित हा मुंबईचा कर्णधार होता, पण ही गोष्ट हार्दिकला जमेल का, असे सेहवागला म्हणायचे असेल. कारण आतापर्यंत मुंबईने पहिल्यांदाच तीन सामने सलग गमावले आहेत, असे नाही.

सेहवाग हा नेहमीच बेधडक वक्तव्य करत असतो. या आयपीएलमध्ये समालोचन करत असताना सेहवागने मुंबई इंडियन्सबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. यापूर्वीही मुंबई इंडियन्सने पिहले तीन सामने गमावले होते, पण त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला एवढे ट्रोल केले गेले नव्हते. प्रथम मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला एवढे जास्त ट्रोल केले जात आहे. त्यामुळेच सेहवागने असे वक्तव्य केले असावे.

वीरेंद्र सेहवागने मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे संघात नेमकं काय घडलं आणि चाहत्यांचा संघाला पाठिंबा कधी मिळतो, हे त्याला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे त्याने मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाबाबत हे मोठे विधान केले आहे. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाखाली आता मुंबईचा संघ चौथा सामना तरी जिंकणार का, याची उत्सुतता सर्वांना लागलेली असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T10:42:59Z dg43tfdfdgfd