हार्दिक पंड्याचं कसं होणार, मुंबई इंडियन्सनंतर भारतीय संघाचंही टेंशन का वाढलं जाणून घ्या...

मुंबई: हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळाडू ही ओळख यंदाच्या आयपीएल हंगामात कुठे तरी गमावली असल्याचे दिसून येत आहे. हार्दिक त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी तसेच वेगवान गोलंदाजीने विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. विश्वचषक स्पर्धेत हार्दिकवर उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. आयपीएलमधील हार्दिकच्या देहबोलीवरुन माजी क्रिकेटपटू आरोन फिंच व ग्रीम स्मिथ यांनी हार्दिक खूप थकलेला, प्रचंड दबावाखाली व हताश दिसत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय टी-२० संघाचे टेंशनही आता वाढलेले असणार आहे.

प्रचंड दडपणाखाली आहे हार्दिक...

फिंचने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की,' हार्दिक या वेळेस खूप निराश आणि थकलेला दिसत आहे. मला असे वाटत आहे की तो प्रचंड दडपन सहन करत आहे. मी स्वतः अशा परिस्थितीतून गेलो आहे. जरी आपण वैयक्तिकरित्या कितीही प्रयत्न केले तरी यशस्वी होताना दिसत नाही. जेव्हा संघ चांगले प्रदर्शन करत नाही तेव्हा कर्णधार म्हणून तुम्हाला संघाच्या प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळे अशा परिस्थितीत असणे खूपच कठीण असते.'

मुंबई इंडियन्स गोंधळलेली दिसत आहे...

साऊथ आफ्रिकाचे महान कर्णधार ग्रीम स्मिथ यांनी म्हटले आहे की, ' मुंबई इंडियन्स पंड्याच्या नेतृत्वाखाली गोंधळलेली दिसत आहे. जर तुम्ही मुंबईचा फलंदाजीचा क्रम पाहिला तर लक्षात येईल. हार्दिक कोणत्यातरी दडपनाखाली असल्याचे दिसत आहे.' ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉटसननेसुद्धा पंड्याच्या कर्णधार म्हणून घेतलेल्या निर्णयावर टीका करत म्हटले की, ' केकेआरने ५७ धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. तेव्हा मुंबई इंडियन्सने आपले सर्वश्रेष्ठ गोलंदाज न उतरवल्यामुळे सामना कोलकाताच्या पक्षात गेला.'

कर्णधारपदावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

वॉटसनने म्हटले की,' केकेआर ५ विकेट्स गमावून ५७ धावांवर होती तेव्हा नमन धीरला गोलंदाजीस उतरवने ही मुंबईची मोठी चूक होती. जरी हा निर्णय हार्दिकने घेतला असेल किंवा बाहेर बसलेल्या प्रशिक्षकांनी. तेव्हा जसप्रीत बुमराहचे केवळ एक षटक झाले होते. व्यंकटेश अय्यर आणि मनिष पांडेची भागिदारी तोडण्याचा प्रयत्न तेव्हा करणे गरजेचे होते. परंतु मुंबईने असे केले नाही त्यांनी त्यांची भागिदारी वाढू दिली.'

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पांड्याला सोपवण्यात आले आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईने ११ सामन्यांपैकी ८ सामने गमावले आहेत. २ जूनपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे, त्यात पंड्याचा गमावलेला विश्वास परत नाही आला तर भारतीय संघास अडचण होऊ शकते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T12:06:46Z dg43tfdfdgfd