हार्दिकचं डोकं ठिकाणावर आहे का... कोणाला ठरवलं मुंबईच्या पराभवाचा व्हिलन जाणून घ्या

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून फक्त १० धावांनी पराभव पत्करावा लागला असता. हा पराभव मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच हा सामना संपल्यावर हार्दिकने पराभवाचा व्हिलन मुंबई इंडियन्सचा कोणता खेळाडू ठरला, हे सांगितले आहे. पण त्यानंतर चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल केले आहे आणि हार्दिकचे डोके ठिकाणावर आहे का, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

दिल्लीतील अरूण जेटली स्टो़डियमवर झालेल्या मुंबईविरूद्ध दिल्लीच्या लढतीत कर्णधार हार्दिकने टॉस जिंकून दिल्लीच्या फलंदाजांना आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने २० षटकांत ४ बाद २५७ धावांचा डोंगर उभारला. या सामन्या दरम्यान कर्णधार हार्दिक संघाच्या कामगिरीवर नाखूश असल्याचे पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग करताना हार्दिकने संघासाठी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. पण, अखेरीस मुंबईला १० धावांनी पराभव पत्करावा लागला. पॉवरप्लेमध्येच मुंबईने राेहित शर्मा, इशान किशन आणि सुर्यकुमार यादवची विकेट गमावली. तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, टिम डेव्हिड यांनी आक्रमकतेने फलंदाजी केली. पण, प्रत्युत्तरात मुंबईला ९ बाद २४७ धावाच करत आल्या आणि मुंबईच्या पदरी निराशाच पडली.

सामना संपल्यावर हार्दिक पंड्या म्हणाला की, " आयपीएल फारच रोमांचक होताना दिसत आहे. यापूर्वी दोन संघांमध्ये काही षटकांचे अंतर असायचे, पण हे अंतर आता फक्त काही चेंडूंचे राहीलेले आहे. हा सामना आम्ही जिंकू, असा मला विश्वास होता. कारण हा सामना आमचाच होता. फलंदाजी करत असताना मधल्या काही षटकांत आमच्या संघातील डावखुरा फलंदाज अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारण्यास अपयशी ठरला. या डावखुऱ्या फलंदाजाने जर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठे फटके लगावले असते तर आम्हाला विजय मिळवता आला असता."

हार्दिकने नाव न घेता तिलक वर्माला सामन्याचा खलनायक बनवले आहे. कारण ईशान किशन तर पॉवर प्ले मध्येच बाद झाला होता. मधल्या षटकांत तिलक वर्मा हा फलंदाजी करत होता. तिलकने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारले नाहीत आणि मुंबईला सामना गमवावा लागला, असे हार्दिकला म्हणायचे आहे. पण तिलकने ३२ चेंडूत ६३ धावा अशी प्रभावी खेळी साकारली होती. तो बाद झाल्यावर मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. पण आता हार्दिकने सर्वाधिक धावा करणाऱ्या तिलक वर्मालाच व्हिलन ठरवले आहे.

गेल्या पाच सामन्यातील दिल्लीचा हा चौथा विजय आहे. त्यामुळे गुणतालिकेत त्यांनी चेन्नईला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले आहे. एकेकाळी गुणतालिकेत अव्वल असणारी मुंबई यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीसोबत तळाशी आहे. आयपीएल २०२४ मध्ये ९ सामन्यातील मुंबईचा हा सहाव्वा पराभव ठरला. या सामन्यात गोलंदाजांनी वाटलेली धावांची खैरात आणि सलामीवीर तसेच आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्लीविरूद्धच्या लढतीतील झुंज पुन्हा एकदा अपयशी ठरली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-28T12:35:31Z dg43tfdfdgfd